स्वतःसाठी खोके घेऊन गप्प बसणा-यांना घरी बसवा: खासदार प्रियंका चतुर्वेदी

0
52

वाकडमध्ये “डायलॉग ऑन डेव्हलपमेंट अँड डेमोक्रसी”तून साधला आयटीयन्ससोबत संवाद

तुमचा आवाज बनण्यासाठी संजोग वाघेरेंना संसदेत पाठवा

दि २८ एप्रिल (पीसीबी ) पिंपरी – मतदारांनी संधी दिल्यानंतर मतदारसंघासाठी मिळणारा संसद‌ निधी देखील पूर्णपणे खर्च करू शकत नाहीत. ते त्यांचे अपयश आहे. मतदारांचा आवाज उठविण्याऐवजी स्वतःसाठी खोके घेऊन गप्प बसले. त्यांना या निवडणुकीत घरी बसवा. रोजगार‌, शिक्षण, आरोग्य सुविधांवर तुमचा आवाज बनतील आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी तुमच्या सोबत राहतील ते महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना‌ मावळ लोकसभा मतदारसंघातून संसदेत पाठवा, असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या तथा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी‌ केले.‌

मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ इंडिया आघाडीच्या वतीने वाकड येथे शनिवारी, (२७ एप्रिल) आयोजित डायलॉग ऑन डेव्हलपमेंट अँड डेमोक्रसी कार्यक्रमातून त्यांनी आयटीयन्ससोबत संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या. या प्रसंगी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मावळ लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील, आम आदमी पार्टी महाराष्ट्राचे कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके पाटील, मावळ लोकसभेचे प्रचारप्रमुख योगेश बाबर, शिवसेना महिला शहर संघटिका अनिता तुतारे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) शहराध्यक्ष तुषार कामठे, आआम आदमी पार्टीचे महाराष्ट्र पदवीधर अध्यक्ष चेतन बेंद्रे, शहराध्यक्ष मीना जावळे, शिवसेनेचे विभागप्रमुख मचिंद्र देशमुख आदी उपस्थित होते.

खासदार प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या की, देशात नामांकित आयटी कंपन्यांमध्ये नव्याने रोजगारनिर्मिती होत नाही. जे आहेत त्यांचा रोजगार कमी केला जातो. देशात प्रथमच आयआयटीतून बाहेर पडणाऱ्यांना नोकरी मिळत नसल्याची स्थिती निर्माण झाली.‌ परंतु, सरकारला याचा जाब विचारण्याची आवश्यकता आहे. ज्यांना निवडून देतो, ते जाब विचारणे सोडून सार्थासाठी गप्प बसतात. देशातील प्रत्येक वर्ग सरकारवर नाराज आहे. जगातील सर्वात जास्त श्रीमंत पार्टी जर भाजप असेल, तर कुठेतरी भ्रष्टाचार होत असल्याचे अधोरेखित होते. नोकरदार, कामगार वर्गाच्या संघर्षात शिवेसेना कायम उभी राहिली. रोजगार गेल्याच्या वेदना जाणाणारा विचार आपला आहे. आयटी वर्गाला येणा-या अडचणींसाठी त्यांच्यासोबत आम्ही राहू. तसेच, महिलांची राजकारणातील भागिदारी वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. इंडिया आघाडीने नोकरीत‌ महिलांना सामावून घेण्याची भूमिका घेतलेली असल्याचेही चतुर्वेदी यांनी आवर्जून सांगितले.

अजित फाटके म्हणाले, भारतातील आयटी क्षेत्राला जे‌ वातावरण लागतं. ते‌ वातावरण नाही. म्हणून आताच्या घडीला मोठ्या प्रमाणात देशातून आयटी कंपन्या इतर देशात जातात. ठराविक उद्योजकांना धंदा, भाजपला चंदा, रोजगार मंदा, अशी अवस्था देशाची झालेली आहे. ठराविक उद्योग, ठेकेदार, कंपन्या यांना कामे देवून विकास होत नाही. ठराविक वर्ग श्रीमंत होत जातो आणि इतर गरीब होत जाणार. लोकशाहीत प्रश्न विचारता आले पाहिजे. ते आपण सर्वाने केले पाहिजे.

संविधान राहील की नाही, हे ठरविणारी निवडणूक : खा. चतुर्वेदी
आपलं संविधान प्रगतिशील आहे. ते संविधान बदलाची भाषा आज भाजपचे लोक करतात. त्यामुळे ही निवडणूक केवळ आपल्या दैनंदिन प्रश्नापुरती राहिलेली नाही. तर संविधान, ‌लोकशाही आणि आपला आवाज उचलण्याचा मौलिक अधिकार पुढे कायम राहणार की नाही, हे‌ ठरविणारी ही निवडणूक असणार आहे. यासोबत सद्यवादी विचारांचा आपल्यावर पगडा आहे. हिंदू असल्याचा सर्वांना गर्व आहे. देशातील दुफळीमुळे इतिहासात कायम आपला पराभव झाला. या निवडणुकीच देशाला सर्वोच्च स्थानी ठेवून मतदान करा, असेही आवाहनही खा. चतुर्वेदी यांनी केले.

संजोग वाघेरे यांनी आयटीयन्ससमोर मांडले व्हिजन…
नगरसेवक, महापौर म्हणून काम केले. त्यामुळे शहर पातळीवर भेडसावणारे प्रश्न मार्गी लावण्यासाठी तुमच्यासोबत मी आहे. सोसायट्यांमध्ये भेडसावणारा पाणीप्रश्न बिकट झालेला आहे. कारण, मागच्या काळात शहरात त्याचे नियोजन झाले नाही. स्मार्ट सिटी व पाणी योजनांच्या घोषणा करून ते होत नसते. त्यासाठी लोकप्रतिनिधी या नात्य़ाने समन्वय़ घडवून, मध्यमार्ग काढून नियोजनाची आवश्यकता असते. ते करून शहरी भागातील पाणीप्रश्नावर, वाहतूक कोंडीवर प्राधान्याने काम करू. यासह मतदारसंघातील गडकिल्ले, निसर्गरम्य, प्रेक्षणीय स्थळे विकसित करून पर्यटनाला चालना दिली जाईल. प्रामुख्याने मतदारसंघात उद्योग कसे वाढतील, त्यातून रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न केला जाईल. तुमच्यासोबत सातत्याने संवाद साधून तुमचे मुद्दे संसदेत मांडण्याचे काम जबाबदारीने करू, अशा शब्दात संजोग वाघेरे पाटील यांनी आयटीयन्सला आश्वस्त केले.

आय़टीयन्स म्हणाले, “तुम्ही खासदारच, आता मतदारसंघ तुमचं कुटुंब..”
प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून आयटीयन्सबरोबर प्रियंका चुतुर्वेदी, संजोग वाघेरे पाटील व अजित फाटके यांनी संवाद साधला. त्यावेळी आयटीयन्सकडून पाणी, वाहतूक कोंडी, करदात्यांची लूट, बेरोजगार, नोक-यांवरील गंडातर हे मुद्दे मांडण्यात आले. त्यावेळी संजोग वाघेरे पाटील तुम्ही फिक्स खासदार आहातच, तुम्ही संपूर्ण मावळ लोकसभा मतदारसंघ तुमचं कुटुंब समजून कामाला लागला. मतदारसंघातील आमचे प्रश्न तुमचे आहेत, असे समजून ते सोडविण्यासाठी प्रयत्न करा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. त्यावर वाघेरे पाटील यांनीही तुमचे प्रश्न, ते माझे प्रश्न समजून काम करण्याचा शब्द दिला.