निकालाच्या अगोदरच विजयाचे बॅनर

0
209

पुणे, दि. २८ (पीसीबी) : कसबापेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी रविवारी मतदान पार पडले. कसबापेठेत ५०.०६ टक्के मतदान झाले. कसबा पेठेतून काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर, भाजपचे हेमंत रासने आणि हिंदू महासंघाचे आनंद दवे यांच्यात लढत आहे. निवडणुकीत आक्रमक प्रचार झाला. हिंदुत्व, मतदार संघातील प्रश्न यावर भर दिला गेला होता. आता मतमोजणी 2 मार्च रोजी होणार आहे. परंतु त्यापूर्वीच भाजप, काँग्रेस उमेदवारांच्या विजयाचे दावे करणारे पोस्टर लावले आहे. विजयाचे बॅनर लावत शुभेच्छा कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्या आहेत.

कसबा विधानसभा मतदारसंघात निकाल आधीच विजयाची बॅनरबाजी सुरु झाली आहे. शहरातील अनेक भागांत पोस्टर लावण्यात आले आहे. आधी काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या विजयाचे बॅनर लागले. त्यानंतर आता हेमंत रासने यांच्या समर्थकांकडून देखील पुण्यात बॅनरबाजी करण्यात आली आहे. पुण्यातील समाधान चौकात हेमंत रासने यांच्या विजयाचे बॅनर लागले आहेत.

निकाल आधीच आमदार हेमंत रासने म्हणत समर्थकांकडून रासने यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सोमवारी पुण्यातील अनेक चौकात रवींद्र धंगेकर यांच्या विजयाचे देखील बॅनर लावण्यात आले होते. पण आता हे विजयाचे बॅनर हटवण्यात आले आहे. मात्र निकाला आधीच दोन्ही गटाकडून मोठी बॅनरबाजी करण्यात येत असल्याने शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.

गुन्हे दाखल –
कसब्याची पोटनिवडणूक मतदानाआधी जशी गाजली तशीच ही निवडणूक मतदानानंतरही चर्चेत आलीय. कारण 3-3 जणांवर गुन्हे दाखल झालेत. ज्यात कसब्यातल्या दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवारांचाच समावेश आहे. भाजपचे उमेदवार हेमंत रासनेंवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झालाय. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकरांवरही आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झालाय. आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटलांवरही आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आलाय. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधताना म्हणाले की, भाजपकडून मतदानासाठी पैसे वाटण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांची तक्रार आता निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.

भाजपची व्होटबँक
कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपची हक्काची व्होटबँक पेठा आहेत. कसबा पेठेतील सदाशिव, नारायण, शनिवार पेठांमधील मतदानाची टक्केवारी 2019 च्या तुलनेत पाच टक्के घटल्याचे समोर आले आहे. 2019 मध्ये आमदार मुक्ता टिळक यांना या विभागातून तब्बल 21 हजारांचे मताधिक्य मिळाले होते. आता हा धक्का नेमका कुणाला बसणार, यावर चर्चा सुरु झाली आहे. परंतु भाजपचे हक्काचे मतदार असल्याने त्या पक्षाला हा फटका बसणार असल्याचे सांगितले जात आहे.