मुंबई, दि. २९ (पीसीबी) – पुढील चार महिन्यात ठाकरे सरकारचे सहा मंत्री सीबीआयच्या दारात असतील असा दावा भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. किरीट सोमय्या यांनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना जाहीर आव्हान दिलं आहे. किरीट सोमय्या कल्याणमध्ये पाहणी दौऱ्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी खासगी आणि सरकारी कोव्हिड रुग्णालयांची पाहणी केली. उपाययोजना न केल्यास १२ मे नंतर करोनाचे मृत्यू प्रमाण वाढण्याची भीती यावेळी त्यांनी व्यक्त केली.
“उद्धव ठाकरे आणि त्यांचं सरकार आता भयंकर भयभीत आहे. सीबीआयने रश्मी शुक्ला यांचा जबाब घेतला आहे. एफआयआरमध्ये अनिल परब यांचाही उल्लेख आला आहे, म्हणूनच ठाकरे सरकारमधील सहा मंत्री सीबीआयच्या निमंत्रणाची वाट पाहत आहेत. परमबीर सिंग, रश्मी शुक्ला आणि सचिन वाझे यांच्यावर दबाब आणण्याचं काम ठाकरे सरकार करत आहे,” असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.
पुढे ते म्हणाले की, “उद्धव ठाकरे यांना माझा थेट आव्हान आहे की, येत्या चार महिन्यात तुमच्या मंत्रिमंडळातील आणि सहयोगी सहा सहकारी जे वसुलीत सहभागी होते ते सीबीआरच्या दारात असणार”.