टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचं अपघाती निधन

0
232

मुंबई,दि.०४(पीसीबी) – टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचं निधन झालं आहे. पालघरमधील चारोटी येथे झालेल्या अपघातात सायरस मिस्त्री यांनी आपला जीव गमावला. अपघातानंतर जागीच त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती मिळत आहे. दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारासा सूर्या नदीवरील पुलावर दुभाजकाला कार आदळून हा अपघात झाल्याचं समजत आहे. अपघातात दोघे जखमी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी बोलताना दिली आहे.

पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, “दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास अहमदाबाद येथून मुंबईला जाणाऱ्या मार्गावर सूर्या नदीच्या पुलावर हा अपघात झाला. अपघातात दोन जखमी झाले असून, दोघांचा मृत्यू झाला आहे. ही मर्सिडीज कार होती. गाडीचा क्रमांक MH-47-AB-6705 असा आहे. पुढील प्रक्रिया सध्या सुरु आहे”. दुभाजकाला गाडीने धडक दिल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

“ही अत्यंत धक्कादायक बातमी आहे. ते टाटा ग्रुपचे चेअरमन असतानी त्यांच्यासोबत काम केलं होतं. बॉम्बे हाऊसमध्ये पहिल्यांदा प्रवेश केला तेव्हा त्यांचं स्वागत करण्यासाठी मीच होतो. त्या चार वर्षांच्या कार्यकाळात बराचसा सहवास मला लाभला. बोर्ड बैठकीच्या दृष्टीने अनेकदा त्यांच्यासोबत भेट व्हायची. सेंट्रल बँकेचे चेअरमन टंकसाळे यांची भेट त्यांनी नाकारली होती, तेव्हा आपले बँकेसोबत पूर्वापार संबंध असून त्यांना भेट नाकारत नाही असं सांगितलं होतं. त्यांनी ते लगेच ऐकून घेतलं होतं आणि भेटण्यासाठी होकार दिला होता,” अशी आठवण सायरस मिस्त्री यांचे माजी सहकारी आणि टाटाचे माजी जनसंपर्क अधिकारी योगेश जोशी यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितली आहे.

सुप्रिया सुळेंनीही सायरस मिस्त्री हे किती साधे होते याच्या आठवणी सांगितल्या. ताज हॉटेलमध्ये पती सदानंद सुळे व सायरस मिस्त्री जेवायला गेले असता तिथल्या कर्मचाऱ्यांना वाटलं सदानंद हेच सायरस आहेत. ते जेव्हा म्हणाले आम्ही तुमच्या स्वागताला आलोय, तेव्हा आम्ही सांगितलं हे सदानंद आहेत व तो सायरस आहेत. इतका लो प्रोफाइल व साधा माणूस होता तो. पाणी पुरी, साबुदाणा खिचडी करा असं सांगून आमच्या घरी हक्कानं ते येत असत असं सांगताना सायरस यांचा मृत्यू झाल्याच्या घटनेवर विश्वासच बसत नसल्याचे सुप्रिया म्हणाल्या.