‘जिहादींच्या सावटाखाली हिंदूंचे सण कधीपर्यंत ?’ या विषयावर विशेष संवाद !

0
269

-हिंदू सणांच्या वेळी होणार्‍या दंगली रोखण्यासाठी हिंदू बांधवांनी संघटित होण्याची गरज ! – श्री. टी. राजासिंह, आमदार, तेलंगाना

तेलंगाना दि. १२ (पीसीबी) –  आज मुसलमान रस्त्यावर नमाज पडू शकतात; मात्र श्रीरामनवमी आणि हनुमान जयंती यादिवशी हिंदूंनी साधी मिरवणूक काढली, तरी त्यात अडचणी निर्माण केल्या जात आहेत. देशात हिंदूंच्या उत्सवांच्या वेळी केल्या जाणार्‍या दंगली आणि इतर हिंसक घटना पाहता त्या रोखण्यासाठी हिंदू बांधवांनी आता संघटित होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन तेलंगाना येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार श्री. टी. राजासिंह यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘जिहादींच्या सावटाखाली हिंदूंचे सण कधीपर्यंत?’ या विषयावर आयोजित ऑनलाईन विशेष संवादात ते बोलत होते.

या वेळी ‘विश्व हिंदु परिषदे’चे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. विनोद बंसल म्हणाले की, श्रीरामनवमी आणि हनुमान जयंती या सणांच्या वेळी हिंदूंच्या मिरवणूकींवर पूर्वीही हल्ले व्हायचे आणि आताही हे सुरूच आहे; मात्र आता हिंदू प्रतिकार करू लागला आहे. बंगाल, बिहार, झारखंड, छत्तीसगड, दिल्ली आदी राज्यांत षड्यंत्रपूर्वक पोलीस-प्रशासनाकडून हिंदूंना मिरवणुका काढण्यास रोखले जात आहे. या मिरवणुकांत धर्मांधांच्या अत्याचाराला लक्ष्य ठरणार्‍या हिंदूंना दोषी ठरवून त्यांना अटक केली जात आहे आणि खरे दोषी मात्र मोकाट फिरत आहेत. यामध्ये धर्मांधांचे समर्थन करणार्‍या संघटना, राजकीय नेते आणि सोशल मीडियावर कार्यरत असलेले तथाकथित ‘फॅक्ट चेकर’ यांचे एकमेकांशी परस्पर संबध आहेत. या सर्वांची यंत्रणा मोडून काढण्याची गरज आहे.

‘सनातन संस्थे’चे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक म्हणाले की, या वर्षीही हिंदू सणांच्या वेळी दंगली घडवून आणल्या गेल्या. यामध्ये महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या दंगलीत ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पी.एफ्.आय.) चा सहभाग होता. आज मुसलमानांची लोकसंख्या देशात 25 कोटी झाली असतांनाही त्यांना अल्पसंख्य म्हणून संबोधले जाणे, ही हिंदूंच्या डोळ्यात ‘धूळफेक’ करण्याचा प्रकार आहे. आज देशात घडणार्‍या विविध घटनांतून भारताला ‘इस्लामिक राष्ट्र’ बनवण्याचा प्रयत्न चालू आहे. आपला देश दुसर्‍या विभाजनाकडे जातो आहे, ही वास्तविकता डोळ्यासमोर दिसत आहे. हिंदू संघटित न झाल्यास हिंदू विनाशाकडे जातील. हे टाळण्यासाठी हिंदूंनी आपल्यासमोरील आव्हाने ओळखून जात-पात, संघटना, पद आदी सर्व बाजूला ठेऊन आता हिंदु राष्ट्रासाठी संघटित व्हायला हवे.

या वेळी पश्चिम बंगाल येथील ‘आत्मदीप’ या संघटनेचे अध्यक्ष अधिवक्ता प्रसून मैत्र म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये मुसलमान समाजाने काहीही केले, तरी कायदेशीरदृष्टया योग्य ठरवले जाते आणि त्याचे समर्थन केले जाते, अशी येथील राजकीय पक्षाची मानसिकता आहे. आज हिंदूंना दुर्बल समजून कायद्याचा धाक दाखवला जातो. भगवान श्रीकृष्णाचा शांतीचा प्रस्ताव कौरवांनी धुडकावून लावल्यावर शेवटी पांडवांना युद्ध करावेच लागले. हिंदूंनी सुद्धा आता केवळ वार्तालापाच्या भूमिकेत न जाता काळाची आवश्यकता ओळखून प्रतिकार करायला शिकायला हवे.