कोंढव्यात मोठा अनर्थ टळला; वेळीच जाग आल्याने वाचले युवकाचे प्राण

0
623

पुणे, दि. १२ (पीसीबी) – घरात लागलेल्या आगीचा झोपेत असलेल्या युवकाला वास आल्याने मोठा अनर्थ टळला आहे. जर झोपेतून तो जागा झाला नसता तर त्याला प्राण गमवावे लागले असते. ही थरारक घटना आग आज (गुरुवार) सकाळच्या सुमारास कोंढवा कात्रज रस्त्यावरील बौद्ध विहार अपार्टमेंट मध्ये असलेल्या एका घरामध्ये घडली.
या घटनेतून ऋषिकेश मोरे (वय १५) हा युवक थोडक्यात बचावले आहे.
अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा कात्रज रस्त्यावरील बौद्ध विहार अपार्टमेंटमधे आज सकाळी पहिल्या मजल्यावर आग लागल्याने अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला रहिवाशी ऋषिकेश मोरे या पंधरा वर्षीय मुलाने सतर्कता दाखवित माहिती कळविली व कोंढवा(खुर्द) अग्निशमन वाहन व देवदूत क्विक रिस्पॉन्स टिम घटनास्थळी दाखल झाली. पहिल्या मजल्यावर असणाऱ्या घरामधे दुरचित्रवाणी संच, कपाट, वायरिंग व इतर घरगुती वापराच्या साहित्याने पेट घेतला होता. जवानांनी ताबडतोब घरामधे पाण्याचा मारा करत दहा मिनिटात आग पुर्ण विझवत आतमधे कोणी अडकले अथवा जखमी नसल्याची खात्री केली. त्याचवेळी तिथे असलेले जवान गणपत पडये यांची सतर्कता महत्वाची ठरली.
प्रत्यक्षदर्शी ऋषिकेश मोरे याने सांगितले की, मी झोपलो असताना अचानक काहीतरी जळत असल्याचा वास आल्याने मी जागा झालो. तर घरातील वीज गेली असून काही वस्तू जळाल्याचे दिसले. म्हणून तातडीने अग्निशमन दलास माहिती कळविली व जवानांनी कामगिरी चोख बजावली.