मुंबई, दि. २७ (पीसीबी) – राज्यात सध्या बाहुबली चित्रपटाची चलती आहे. नरेंद्र बाहुबली, देवेंद्र बाहुबली या बाहुबलींचे सरकार व्यवस्थित काम करत आहेत. यात किती बल्लालदेव, कालकेय आले, तरी बाहुबली हरणार नाही, असा टोला आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादीचे नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना लगावला आहे.
विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणाला विरोध करताना धनंजय मुंडे यांनी ‘3 इडीयट्स’, ‘शोले’, ‘रामगड के शोले’, ‘ऑल इज वेल’ या चित्रपटांचा उल्लेख करत सरकारवर टीका केली. यावर टीका करताना सुरेश धस म्हणाले की, ‘शोले’ तर आमचा आहेच, परंतु विरोधी पक्षांचा ‘रामगड के शोले’ झाला आहे, असा टोला दिला .
राष्ट्रवादीची अवस्था ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटासाखी झाली आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन, जया भादुरी, ऋतिक रोशन हे मल्टिस्टार होते, परंतु चित्रपट मात्र फ्लॉप झाला होता. राष्ट्रवादीची अवस्था अशीच झाली आहे. नावं खूप मोठी पण चित्रपट फ्लॉप आहे.