ईडीच्या कोठडीत असताना राऊतांनी लिखाण कसं काय केलं ?

0
186

मुंबई, दि. ८ (पीसीबी) – शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून संजय राऊतांनी रोखठोक सदर लिहिलं आणि त्यामुळे आता ईडी आणखी सतर्क झाली आहे. ईडीच्या कोठडीत असताना राऊतांनी लिखाण कसं काय केलं, या प्रकरणी ईडी तपास करणार असल्याची माहिती आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी याविषयी शंका उपस्थित केली होती. तुरुंगात असताना कोणतीही व्यक्ती अशा प्रकारे लेख लिहू शकत नाही. लेख लिहायचा असेल, तर न्यायालयाच्या विशेष परवानगीची आवश्यकता असते. त्याशिवाय लेख लिहिता येत नाही. म्हणूनच आता या प्रकरणात ईडीकडून संजय राऊतांची चौकशी होणार असल्याचं वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

रविवारी सामनामध्ये प्रकाशित झालेल्या रोखठोक या सदरात संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर कठोर टीका केली होती. मुंबईतून राजस्थानी आणि गुजराती गेले तर मुंबईत पैसा शिल्लक राहणार नाही, असं विधान कोश्यारी यांनी केलं होतं. त्याविषयी आपल्या लेखात राऊत म्हणाले की, जेव्हा मराठी उद्योजक साखर कारखाने, गिरण्या आणि इतर उद्योग चालवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा ईडी त्यांच्यावर कारवाई करते. त्याबद्दलही राज्यपाल कोश्यारींनी काहीतरी बोलायला हवं.

या रोखठोकबद्दल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी टीका करत शंका उपस्थित केली होती. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटकेत असलेले राऊत हे तुरुंगातून लेख लिहायला स्वातंत्र्यसेनानाही आहेत का? असा प्रश्न देशपांडेंनी विचारला होता. आता या प्रकरणाची ईडीकडून चौकशी केली जाणार आहे.