“अब तक सिर्फ छप्पन, और भी आगे जायेंगे…”

0
222

मुंबई, दि. १९ (पीसीबी) : शिवसेनेचा आज ५६ वा वर्धापन दिन आहे. तर उद्या विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत बोलत होते. शिवसेनेच्या स्थापनेनंतर देशभरात प्रादेशिक पक्षांच्या स्थापना व्हायला लागल्या. शिवसेनेचे “अब तक सिर्फ छप्पन, और भी आगे जायेंगे…” असं मत शिवेसनेचे संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.

“भूमीपुत्रांची जी भूमिका होती ती भूमिका घेऊन शिवसेनेची स्थापना झाली. आणि तीच भूमिका घेऊन देशभरात प्रादेशिक पक्षांची स्थापना झाली. याच प्रादेशिक पक्षांच्या करंगळीवर देश उभा आहे. याचं श्रेय शिवसेनेला द्यावं लागेल. आज तीच शिवसेना दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचली आहे.” असं संजय राऊत शिवसेनेच्या ५६ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने बोलताना म्हणाले आहेत.

“देशभरात शिवसेना हिंदुच्या न्याय आणि हक्कासाठी लढत आहे, आणि वर्धापनदिनाच्या मुहूर्तावर आज पक्षप्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. ते काय बोलतील याच्याकडे लोकांचे लक्ष लागलेले आहे. तसेच कोणताही राष्ट्रीय पक्ष प्रादेशिक पक्षांच्या मदतीशिवाय पुढे जाऊ शकत नाही ही ताकद प्रादेशिक पक्षांची आहे. आणि शिवसेनेला याचं सर्व श्रेय जातं. शिवसेनेचे अब तक सिर्फ छप्पन, और भी आगे जायेंगे…” असं राऊत म्हणाले.

विधानपरिषदेच्या निवडणुका उद्या होणार असून महाविकास आघाडीचे दोन मत कमी करण्यासाठी भाजपकडून खेळी खेळली जात आहे. त्यांनी आमच्या नवाब मलिक आणि अनिल देशमुख या सदस्यांना कोणत्या अधिकाराखाली मतदानाचा अधिकार नाकारला ? असा सवाल त्यांनी केला आहे. या खेळीमुळे देशाची न्यायव्यवस्था धोक्यात आली आहे असा आरोप त्यांनी यावेळी बोलताना केला आहे.

दरम्यान उद्या विधानपरिषदेच्या १० जागांसाठी मतदान होणार आहे. यामध्ये महाविकास आघाडीचे सहा उमेदवार तर भाजपचे पाच उमेदवार रिंगणात आहेत. यावेळी काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. आमदारांचा घोडेबाजार होऊ नये यासाठी सर्व पक्षांकडून खबरदारी घेतली जात आहे.