अनधिकृत फलक तातडीने काढा; जनसंवाद सभेत नागरिकांची मागणी

0
257

पिंपरी, दि. १० (पीसीबी) – नागरिकांच्या सोयीसाठी विविध ठिकाणी नव्याने पीएमपीएमएलचे बस स्थानक उभारण्यात यावेत. विद्युत खांबांवर अनधिकृतपणे लावण्यात आलेले फ्लेक्स वा-यामुळे उडून नागरिकांवर पडत असून त्यामुळे जीवितास धोका निर्माण झाला आहे. असे फ्लेक्स तातडीने काढावेत, अनधिकृतपणे फ्लेक्स लावणाऱ्यांवर कारवाई करावी, अशा तक्रारवजा सूचना नागरिकांनी जनसंवाद सभेत मांडल्या.

पिंपरीचिंचवड महापालिकेच्या आज (सोमवारी) पार पडलेल्या जनसंवाद सभेत 54 नागरिकांनी सहभाग घेऊन तक्रारवजा सूचना मांडल्या. यात अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयामध्ये अनुक्रमे 16, 4, 3, 6, 4, 1, 8 आणि 12 इतक्या नागरिकांनी उपस्थित राहून आपले म्हणणे मांडले. अ, ब, क, ड, ई, फ, ग, ह, या क्षेत्रीय कार्यालयांच्या जनसंवाद सभेचे अध्यक्षपद मुख्य समन्वय अधिकारी असलेले अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, सह शहर अभियंता प्रमोद ओंभासे, उप आयुक्त चंद्रकांत इंदलकर, आरोग्य विभागाचे उप आयुक्त अजय चारठाणकर, सहायक आयुक्त प्रशांत जोशी, यांनी भूषवले. तसेच आठही क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी, सुचिता पानसरे, सोनम देशमुख, अण्णा बोदडे, उमाकांत गायकवाड, राजेश आगळे, सीताराम बहुरे, शीतल वाकडे, विजयकुमार थोरात हे उपस्थित होते. क्षेत्रीय कार्यालयातील जनसंवाद सभेत स्थापत्य, जलनिस्सारण, पाणीपुरवठा, विद्युत, नगररचना विभागांचे कार्यकारी अभियंता, उद्यान, वैद्यकीय, आरोग्य, करसंकलन या विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

शहरात ठिकठिकाणी आरोग्य विभागाच्या वतीने धूर फवारणी करण्यात यावी, जलवाहिन्यांचे अर्धवट असलेले काम पूर्ण करावे तसेच फुटलेल्या जलवाहिन्या दुरुस्त कराव्यात, कचरा संकलित करण्यासाठी येणा-या घंटा गाडीवरील स्पीकर सुव्यवस्थित ठेवावेत, उघड्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर कारवाई करावी, शहरात विविध ठिकाणची अतिक्रमणे काढण्यात आली आहेत, अशा ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घ्यावी, रस्त्याचे अर्धवट असलेले काम पूर्ण करावे, रस्त्यांचे काम दर्जेदार होईल याची दक्षता घ्यावी, पदपथांवरील राडारोडा उचलावा, रस्त्यांच्या बाजूने पथदिवे लावावेत, रस्त्याच्या मध्यभागी आणि पदपथावरील निघालेले पेव्हिंग ब्लॉक तात्काळ बसवावेत, नाल्यांमधून वाहणारे पाणी रस्त्यांवर आल्यामुळे दुर्गंध पसरून आरोग्यास धोका निर्माण होतो आहे, फुटलेल्या मलवाहिन्या लवकर दुरुस्त करावे, अशा सूचना व तक्रारी आज झालेल्या जनसंवाद सभेमध्ये नागरिकांनी मांडल्या.