५० खोके जर नसतील मिळाले, तर किती मिळाले आणि किती राहिलेत, याचाही हिशोब द्यावा

0
196

मुंबई, दि. २८ (पीसीबी) – अमरावतीच्या अचलपूर येथील अपक्ष आमदार बच्चू कडू आणि बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांच्यातील वाद टोकाला पोहचल्याचे मागील काही दिवसांमध्ये दिसून आले आहे. दोघांकडूनही ऐकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात येत आहे. अलीकडेच राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांनी गुवाहाटीला जाऊन कोट्यवधी रुपये लाटल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर बच्चू कडू आक्रमक झाले असून त्यांनी नागपुरात पत्रकार परिषद घेत आमदार रवी राणा यांना प्रत्युत्तर दिलं. शिवाय “राणांच्या आरोपानंतर आम्ही त्यांना १ नोव्हेंबरपर्यंत पुरावे सादर करण्याचे आव्हान दिले आहे. कोणावर आरोप करताना पुरावे असेपर्यंत बोलून नये, असा साधारण नियम आहे. याबाबतीत आम्ही न्यायालयात जाणार आहोत.” असेही बच्चू कडू म्हणाले आहेत. यावर आज शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली.

अनिल परब म्हणाले, “बच्चू कडूंना आमच्याकडून शुभेच्छा आहेत, ही लढाई त्यांनी जोरात लढावी. ही त्यांच्या स्वाभिमानाची लढाई आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की ५० खोके जर नसतील मिळाले, तर किती मिळाले आणि किती राहिलेत, याचाही हिशोब द्यावा.” यावर माध्यम प्रतिनिधींनी तुमच्या संपर्कात आहेत का बच्चू कडू? असा प्रश्न केल्यावर परबांनी “आमच्या संपर्कात कोणी नाही. आम्ही कोणाशी संपर्क केलेला नाही.” असं स्पष्ट केलं.

याशिवाय, बच्चू कडूंच्या या स्पष्टीकरणाच्या मागणीला तुमचं समर्थन आहे का? यावर परब म्हणाले, “नेमकं अजून हे कळलेलं नाही की कबूल केलेले पूर्ण मिळालेले नाहीत की अजिबातच मिळालेले नाही. दोन गोष्टी असू शकतात. एकतर कबूल केले आणि मिळाले नाहीत किंवा अजिबात मिळालेले नाही. अजून बच्चू कडूंनी सांगितलेलं आहे की आम्हाला मिळालेले नाही. त्याचं पुढचं कदाचित वाक्य त्यांनी सांगावं की अजिबात मिळालेले नाही किंवा अर्धे मिळाले आहेत.”

हे सगळं प्रकरण न्यायालयातही जाणार आहे, असं माध्यम प्रतिनिधींनी सांगितल्यावर परब यांनी “कदाचित न्यायालयात साक्ष तपासली जाईल. त्यावेळी सगळ्या गोष्टी बाहेर येतील. अर्धवट मिळाले, पूर्ण मिळाले नाहीत. त्यामुळे बच्चू कडूंना या लढाईला मी शुभेच्छा देतो.” अशी प्रतिक्रिया दिली.

१ ऑक्टोबरपर्यंतचा बच्चू कडूंनी अल्टिमेट दिलेला आहे. १ तारखेपर्यंत स्पष्टीकरण मिळालं नाहीतर आठ आमदार असे आहेत की जे वेगळा निर्णय घेऊ शकतात, असंही बच्चू कडूंनी म्हटलेलं आहे. असं माध्यम प्रतिनिधींनी म्हटल्यावर, परब म्हणाले, “मी पुन्हा एकदा सांगतो या सगळ्या गोष्टींना आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. कारण, या भानगडी आमच्या नाहीत, त्या त्यांच्या अंतर्गत भानगडी आहेत त्या त्यांनी लढाव्यात आणि दुष्मन का दुष्मन दोस्त होता है.”