हवेत उडणाऱ्यांना जनतेने जमिनीवर उतरवले; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

0
710

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – ‘हिंदी पट्ट्यांतील तीनही राज्ये भाजपच्या हातून निसटली आहेत. तेलंगणात पुन्हा चंद्रशेखर राव विजयी झाले. तेथेही भाजप काँग्रेसच्या खाली आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी ‘काँग्रेसमुक्त भारत’चे जे स्वप्न पाहिले होते त्याची धूळधाण भाजपशासित राज्यातच उडाली आहे,’ असे सांगतानाच ‘या राज्यांत जनतेनेच ‘भाजपमुक्त’चा संदेश दिला असून हवेत उडणाऱ्यांना जनतेने जमिनीवर उतरवले आहे,’ असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला आहे.

मध्यप्रदेश, राजस्थानसह छत्तीसगड, मिझोराम आणि तेलंगणमध्ये भाजपचा अक्षरश: धुव्वा उडाला आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेनेने अधिक आक्रमक होत भाजपवर जोरदार शरसंधान साधलेआहे. ‘पाच राज्यांत काय होईल याची गणिते आणि जमाखर्च मांडले जात होते. भारतीय जनता पक्षाला एकाही राज्याचे गणित धडपणे सोडवता आले नाही व राहुल गांधी यांचा ‘पेपर’ कोरा आहे असे ज्यांना वाटत होते त्यांची गणिते कोलमडली आहेत. मोदी आणि शहा जेमतेम काठावर आले आहेत आणि राहुल गांधी ‘मेरिट’ म्हणजे गुणवत्ता यादीत चमकल्याचा निकाल लागला आहे. मोदी यांचा उदय व भाजपची विजय यात्रा ज्या राज्यांतून सुरू झाली तेथेच भाजपच्या रथाची चाके रुतली आहेत,’ असा टोलाही उद्धव यांनी हाणला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून उद्धव यांनी ही टीका केली आहे.

मोदी हे भाजपचे पंतप्रधानपदाचे ‘चेहरा’ आहेत असा ठराव संमत झाल्यानंतर चार राज्यांत विधानसभा निवडणुका झाल्या (चूकभूल द्यावी-घ्यावी) व तेथे प्रचंड विजय मिळवून ‘हा मोदी यांचा पायगुण बरं का!’ अशा घंटा बडवण्यात आल्या. आता मोदी पंतप्रधान असतानाच याच चार राज्यांत भाजपला ‘जबर’ फटका बसला आहे.

थापा मारून सदासर्वकाळ विजयी होता येत नाही. राजस्थानात शेतकरी अडचणीत आहे. मध्य प्रदेशात न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांवर गोळ्या घातल्या गेल्या. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी माफी मागितली, पण शेतकऱ्यांनी शेवटी मतपेटीतून सूड घेतला.