सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा; १२ ओळखपत्रांद्वारे मतदारांना मतदान करता येणार -दीपक सिंगला

0
40

मावळ लोकसभा मतदार संघाच्या निवडणूकीची प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया येत्या सोमवारी १३ मे रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या कालावधीत पार पडणार आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या महोत्सवात मावळ लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदारांनी प्रभावाखाली न येता निर्भयपणे आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे.

लोकसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी मतदाराने छायाचित्र असलेले मतदान ओळखपत्र सोबत बाळगावे, मतदार ओळखपत्र सोबत नसल्यास ओळख म्हणून भारत निवडणूक आयोगाने निश्चित केलेले अन्य १२ पुरावे ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले जाणार आहेत. त्यानुसार १२ पुराव्यांपैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर संबंधित मतदारांना निवडणुकीत मतदान करता येणार आहे. त्यामुळे मतदार यादीत असलेले ज्येष्ठ मतदार, महिला, पुरुष, तृतीयपंथी मतदारांसह नवमतदारांनी मतदान करत मोठ्या उत्साहात लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावे, असे देखील निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी म्हटले आहे.

भारत निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या मतदार ओळख पुराव्यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र, बँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक, वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), पारपत्र (पासपोर्ट), केंद्र अथवा राज्य शासन, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड, निवृत्तीवेतनाची दस्तावेज, संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाच्यावतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र, कामगार मंत्रालयाद्वारा वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड या पुराव्यांचा समावेश आहे.

प्रवासी भारतीयांना त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांचा मूळ पासपोर्ट आवश्यक असणार आहे. मतदारांनी मतदान केंद्रावर जाताना मतदार माहिती चिठ्ठी आणि मतदार छायाचित्र ओळखपत्र असल्यास मतदार ओळखपत्र किंवा वरील १२ पैकी कोणताही एक पुरावा सोबत न्यावा, असेही आवाहनही प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.