पुणे, दि. २ (पीसीबी) : विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी विश्वशांती विद्यापीठ, पुणे, भारत व श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमानेे संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा ७२५ वा संजीवन समाधी सोहळा व जागतिक सहिष्णुता सप्ताहाचा समारोप विश्वरूपदर्शन मंच, श्रीक्षेत्र आळंदी येथे आज दुपारी १२.०० वाजता वारकर्यांच्या उपस्थितीत पार पडला. इंद्रायणी नदीच्या दोन्ही तीरावरील वारकर्यांनी गुलाल, बुक्का व फुलांची ओंजळ वाहून ज्ञानेश्वर माऊलीेचे भावपूर्ण स्मरण केले. भजन करून नामस्मरणाचा गजर केला. या वेळी विश्वरुप दर्शनमंचावर घंटानाद करण्यात आला. विश्वशांती केद्राच्या वतीने वारकर्यांना महाप्रसाद देण्यात आला.
तत्पूर्वी ह.भ.प.डॉ.सुदाम महाराज पानेगांवकर यांनी काल्याचे कीर्तन केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली. याद्वारे शेकडो वर्षांची परंपरा जपण्यात आली. इंद्रायणीच्या घाटावर वारकर्यांनी या समाधी सोहळ्याच्या काल्याच्या महाप्रसादाचा लाभ घेतला.
या समारंभासाठी विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, ह.भ.प.श्री. तुळशीराम दा. कराड, सौ. उषा विश्वनाथ कराड, पं. वसंतराव गाडगीळ, एमआयटी आर्ट, डिझाईन अॅण्ड टेक्नॉलॉजी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश तु. कराड, माईर्स मायमर वैद्यकीय महाविद्यालयाच्या कार्यकारी संचालिका डॉ. सुचित्रा कराड-नागरे, डीडी सह्याद्रीचे माजी संचालक श्री. मुकेश शर्मा, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरु डॉ. रविकुमार चिटणीस, ह.भ.प.श्री. नारायण महाराज उत्तरेश्वर पिंप्रीकर, ह.भ.प.श्री.बाबामहाराज काडगांवकर, प्रा.स्वाती कराड-चाटे, डॉ. मिलिंद पांडे व अशोक उमरगेकर हे उपस्थित होते.
या सप्ताहात ह.भ.प.श्री. गणपत महाराज जगताप, ह.भ.प. श्री. हरीहर महाराज दिवेगांवकर, ह.भ.प. श्री. रामराव महाराज ढोक, ह.भ.प.श्री. किसनमहाराज साखरे यासारख्या नामवंत कीर्तनकारांनी कीर्तनरूपी सेवा सादर केली. तसेच, ह.भ.प. श्रीमती गोदावरीताई मुंडे , पं. रविंद्र यादव, पं. निवृत्ती धाबेकर व सौ. भाग्यश्री देशपांडे व विश्वशांती संगीत कला अकादमीच्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी अभंगवाणी व भक्तीसंगीताचे कार्यक्रम सादर केले.
ह.भ.प.श्री.बापूसाहेब मोरे-देहूकर म्हणाले,“संत सेवा हीच भगवंताच्या प्राप्तीचे महाद्वार आहे. भगवंताच्या सेवेपेक्षाही संतांची सेवा श्रेष्ठ आहे. संत सेवेचा फायदा काय?तर त्यांच्या माध्यमातून देवापर्यंत पोहचण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. देव हे भक्त वात्सल्य असतात तर संत हे जग वात्सल्य असतात म्हणून संताची महिमा ही शब्दात सांगता येत नाही. या सृष्टीवरील प्रत्येक संत हे स्वतःच्या दुखांना विराम देऊन दुसर्यांचे दुख सावरण्यास पुढे येतात. त्यांना सुख, शांतीचा मार्ग दाखवितात.”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, या सप्ताहात प्रवचन, कीर्तन, गायन व भजन या मार्गाने नामवंतांनी माऊलीचरणी आपली सेवा रूजू केली. यापुढेही वर्षभर लोकशिक्षणाचे विविध कार्यक्रम या विश्वरूप दर्शन मंचावर होेणार आहेत. त्यामध्ये पर्यावरण स्वच्छता व निकोप, सुसंस्कृत समाजनिर्मितीसाठी जनजागृती याद्वारे विज्ञान व अध्यात्म यांचा संगम होईल. पवित्र तीर्थक्षेत्रांचे खर्या अर्थाने ज्ञानतीर्थक्षेत्रामध्ये परिवर्तन घडविण्याचा आमचा प्रयत्न आहे. ज्ञान, कर्म आणि भक्तीतून ईश्वर दर्शन होते. त्याग आणि समर्पणाचा संतांनी दिलेला संदेश व त्यांची शिकवण आत्मसात करून त्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करावा.
ह.भ.प. श्री.विशाल महाराज खोले म्हणाले,“ संंत ज्ञानेश्वर, संत मुक्ताबाई यांसारख्या संतांनी त्याग आणि समर्पणाचा संदेश संपूर्ण मानवजातीला दिला आहे. त्याग आणि समर्पणातून विविध क्षेत्रात ज्या लोकांनी कार्य केले त्या त्या क्षेत्रामध्ये मोठी क्रांती घडली आहे. अशीच क्रांती संत साहित्यामुळे घडली आहे. त्याचाच परिणाम आज आपल्याला वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून दिसत आहे.”
श्री.शालीकराम खंदारे यांनी सूत्रसंचालन व महेश महाराज नलावडे यांनी आभार मानले.