श्रीमंतांच्या पोरांना अडकवून खंडण्या उकळण्याचा भाजपचा कारभार; जे धोतरात कमावले ते….’ : शिवसेनेचा प्रहार

0
237

मुंबई, दि.०९ (पीसीबी) : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून रोखठोक भाष्य केलं जात. काँग्रेस पक्षावर सातत्याने घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या भाजपला आज ‘सामना’ चांगलेच फैलावर घेतले आहे. ‘हा पक्ष एखाद्या कुटुंबाच्या हातात नाही असे श्री. मोदी यांनी सांगितले. कुटुंबकेंद्रित असणे व व्यक्तिकेंद्रित असणे यात फार फरक नाही. एकाच नाण्याच्या त्या दोन बाजू आहेत’, असा घणाघात शिवसेनेने केला आहे.

सामनामध्ये असं म्हंटल आहे कि, “मोदी-शहा यांच्याव्यतिरिक्त आज भाजपमध्ये अन्य कुणाचे बोलणे ऐकले जाते काय? राष्ट्रीय कार्यकारिणी वगैरे हा सर्व मुखवटा आहे. पंतप्रधान मोदी यांच्याशिवाय भाजपकडे निवडणूक जिंकून देणारा चेहराच नाही. त्यामुळे इतर मोहोऱ्यांनी उगीच फडफड करू नये. सात वर्षांत जनतेचा विश्वास खरोखरच जिंकला असता तर फक्त ‘मोदी मोदी’ करण्याची वेळ पक्षावर आली नसती. भारतीय जनता पक्षाच्या आजवरच्या जडणघडणीत ज्यांनी हयात घालवली अशा सगळय़ाच ज्येष्ठश्रेष्ठांना आज ‘मार्गदर्शक मंडळा’च्या कोंदणात ‘मानाचे स्थान’ दिले असले तरी हा व्यक्तिकेंद्रित आणि ‘उदो उदो’ राजकीय व्यवस्थेचाच भाग आहे. भारतीय जनता पक्षाची उभारणी व जडणघडण करण्यात आडवाणी यांनी आयुष्य वेचले आहे. अटलबिहारी वाजपेयी आणि आडवाणी यांनी जनतेचा विश्वास सरळ मार्गाने जिंकला होता. कुटुंबाची सत्ता हा वेगळा भाग, पण व्यक्तिकेंद्रित सत्तेचा पट दोन-चार लोकांच्याच हाती असतो व ते त्याचेच कुटुंब असते. त्या कुटुंबापलीकडे सत्तेचा परिघ सरकत नाही. गांधी घराणे आहेच, पण आज कोणती घराणी सत्ता चालवीत आहेत हे काय देशाला माहीत नाही?, असा सवाल ‘सामना’तून उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे आता शिवसेनेच्या या टीकेला भाजप कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

एनसीबीच्या सुपारीबाज अधिकाऱ्यांच्या टोळीशी ‘जॉइण्ट व्हेंचर्स’ करून ड्रग्जसंदर्भातले खेटे गुन्हे दाखल करायचे. श्रीमंतांच्या पोरांना याबाबत अडकवायचे व खंडण्या उकळायच्या, असा नवा कारभार भाजपपुरस्पृत लोकांच्या सहकार्याने सुरू झाला आहे. त्यासाठी श्रीमंतांच्या मुलांचे अपहरण करण्यापर्यंत मजल गेली. राजकरणात पैसे कमावण्याचा हा नवा उद्योग सुरू झाला आहे व भाजपचे भागभांडवल या उद्योगात मोठय़ा प्रमाणात गुंतले आहे. हे असे पितळ उघडे पडत असताना एखादा पक्ष जनतेचा विश्वास कसा जिंकेल? जे धोतरात कमावले ते लुगडय़ात गमावले, असा काहीसा प्रकार घडत आहे.