शिवसेनेतील माजी मंत्री विजय शिवतारे कुटुंबातील वाद चव्हाट्यावर

0
575

मुंबई, दि. २२ (पीसीबी) : शिवसेनेचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या कन्येने आई-भावांवर आरोप केल्यानंतर विजय शिवतारे यांच्या पत्नी मंदाकिनी शिवतारे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. गेल्या 27 वर्षांपासून माझे पती विजय शिवतारे कुटुंबापासून अलिप्त असून पहिली पाच वर्ष एका महिलेसोबत लग्न करुन राहत होते. त्यानंतर आजतागायत दुसऱ्या महिलेसोबत पवईला राहत आहेत, असा दावा मंदाकिनी यांनी मुलगा विनय शिवतारे यांच्या फेसबुक अकाऊण्टवरुन लाईव्ह येत केला आहे. त्यामुळे शिवतारे कुटुंबातील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

विजय शिवतारे यांच्या पत्नी मंदाकिनी शिवतारे यांनी मुलगा विनय शिवतारे यांच्या फेसबुक अकाऊण्टवरुन लाईव्ह येत लेकीचे आरोप फेटाळले. मुलगी ममता यांनी मुलगा विनय आणि विनस यांच्यावर केलेले आरोप धादांत खोटे आहेत. वास्तविक गेल्या 27 वर्षांपासून माझे पती विजय शिवतारे कुटुंबापासून अलिप्त राहत होते. त्यातील पहिली पाच वर्ष उज्ज्वला बागवे नावाच्या महिलेसोबत लग्न करुन राहत होते. त्यानंतर आजतागायत मीनाक्षी पटेल यांच्यासोबत पवईस राहत आहेत. संपत्ती हा वादाचा विषय नाही, विजय शिवतारेंच्या मानसिक जाचातून सुटका करुन घेणे, हा माझा आणि माझ्या कुटुंबाचा एकमेव हेतू आहे, असा दावा मंदाकिनी शिवतारे यांनी केला आहे.

“माझ्या पित्याची माझ्याच भावांनी संपत्तीच्या लोभापायी केलेली दयनीय अवस्था पाहून आज मी अत्यंत अस्वस्थ आहे” असा आरोप विजय शिवतारे यांची कन्या आणि आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांच्या पत्नी ममता शिवतारे लांडे यांनी वडिलांच्या फेसबुक अकाऊण्टवरुन केला आहे. “मी ममता शिवदीप लांडे-शिवतारे, आजवर आपण बापूंच्या राजकीय कारकीर्दीत क्वचितच मला पाहिले असेल. मग आज मी बोलत आहे तर नक्कीच त्यामागे एक मोठ्ठं कारण आहे. बापूंसारखे वडील मला मिळाले हे माझे भाग्य. मला त्यांनी फुलासारखं जपलं. माझी प्रत्येक जबाबदारी अतिशय खंबीरपणे पार पाडली. मला अपार प्रेम दिलं. माझ्या आयुष्यात त्यांना देवापेक्षाही वरचं स्थान आहे. अश्या माझ्या पित्याची माझ्याच भावांनी संपत्तीच्या लोभापायी केलेली दयनीय अवस्था पाहून आज मी अत्यंत अस्वस्थ आहे” असं ममता यांनी विजय शिवतारे यांच्या फेसबुक अकाऊण्टवरुन लिहिलं आहे.

“मागील काही दिवसात फेसबुक वरून होत असलेल्या पोस्टने आपल्या मनात संभ्रम निर्माण केला आहे. माझा भाऊ विनय विजय शिवतारे काही कौटुंबिक वादातून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. यापूर्वीही कित्येक वर्ष असाच त्रास बाबांनी सहन केला. मात्र कधीही त्यावर प्रतिक्रिया दिली नाही, कारण त्यामुळे माझे भाऊ व त्यांच्या कुटुंबाला हानी पोहोचेल असं त्यांना वाटत होतं व आजही वाटतं.” असं पुढे लिहिलं आहे.
“आजारी वडिलांचा भावांकडून मानसिक छळ” –
“मागील वर्षी जानेवारी 2020 मध्ये अत्यंत गंभीर प्रकृती असताना त्यांची बायपास झाले हे आपणा सर्वांना माहीतच आहे. डॉक्टरांनी त्यांच्या वाचण्याची शक्यता 20 टक्के आहे असे सांगितले. माझा भक्कम असा आधारस्तंभ ढासळतो की काय या भीतीने माझी झोपच उडाली होती. ऑपरेशन यशस्वी झालं, मात्र त्यानंतरही जीवाला धोका असताना माझा मोठा भाऊ सतत धमक्या देऊन मानसिक त्रास देत होता. मागील दीड वर्षांपासून किडनीच्या आजारामुळे बाबा एक दिवसाआड डायलीसिसला जातात. या दीड वर्षात एकदाही माझ्या दोन्ही भावांपैकी कोणीही त्यांना भेटायला सुद्धा आले नाही. ते आहेत की नाही? याची सुद्धा विचारपूस केली नाही. त्यांची प्रकृती नाजूक असल्याने मानसिक दबाव अजून वाढवून, त्यांना कमकुवत करण्याचे प्रयत्न सुरु झाले.” असा आरोप ममता यांनी केला आहे.

“वडिलांची सोशल मीडियाद्वारे बदनामी” –
“आजवर आयुष्यभर कमावलेली सगळी संपत्ती विनय, विनस आणि त्यांच्या कुटुंबाच्या नावे बाबांनी केली. तरीही जेजुरीतील इथेनॉल प्लांट नावावर करून देण्यासाठी वारंवार त्यांच्याकडून दबाव टाकण्यात येत आहे. या सर्व गोष्टीत मी कायम फक्त बघ्याची भूमिका बजावत होती. मी स्वतः डॉक्टर असल्याने त्यांच्या प्रकृतीची गांभीर्याने दखल घेत मी जानेवारी 2021 मध्ये हॉस्पिटलचा राजीनामा दिला व पूर्ण वेळ बाबांसोबत राहून त्यांच्या कामाचा ताण कमी करण्याचा व आरोग्याची काळजी घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कदाचित त्यांना बळ मिळाले आणि विनयच्या धमक्यांकडे त्यांनी लक्ष दिलं नाही. मात्र मागील दोन महिन्यांपासून तो दबाव सोशल मीडियाद्वारे बदनामी करून सतत वाढवला जात आहे. सर्व संपत्ती नावावर करूनही मानसिक त्रास कमी होत नव्हता. तो आताही अश्याच बदनामीच्या धमक्या देत आहे.” असंही ममता यांनी लिहिलं आहे.
“आपण माझ्या बाबांवर अफाट प्रेम केलंत. तेच त्यांच्यासाठी सर्वस्व आहे. ते प्रेम कधीही कमी पडू देऊ नका. आणि बाबाही अविरत पुरंदर साठी आपला जीव ओततील. आज सर्व काही सहनशीलतेच्या पलीकडे गेलं आहे आणि त्याच धक्क्याने त्यांना पहाटे हृदयविकाराचा झटका आला. आयसीयूमध्ये रात्री दोन वाजता मी त्यांना घेऊन आली, ऍडमिट केले. माझी देवाला प्रार्थना आहे ,मला बळ दे!!!” अशी प्रार्थना ममतांनी केली आहे.
ममता शिवतारे पांडे यांनी उपस्थित केलेले प्रश्न –

1) 1994 साली घडलेल्या घटना सत्य असोत वा असत्य, आज 27 वर्षानंतर त्या का आठवाव्यात?
2) बाबांचा इतका द्वेष वाटत असेल तर त्यांचा राजकीय व आर्थिक व्यवहार विनय शिवतारेने 2018 पर्यंत का सांभाळला?
3) बाबांनी कमावलेली संपत्ती आजवर दोघांनी निमूटपणे नावे का करून घेतली?
4) विनय शिवतारे आणि विनस शिवतारे यांनी स्वकर्त्वृत्वावर आजवर काय कमावलं?
5) वाद सर्व घरात असतात, म्हणतात ना घरोघरी मातीच्या चुली… पण मृत्यूशय्येवर असलेल्या वडिलांसोबत असा व्यवहार कितीही वाईट असले तरी कोणी मुलगा करणे योग्य आहे का?