लखनौ,दि.२५(पीसीबी) : उत्तर प्रदेशातील कामगारांचा शिवसेना-कॉंग्रेस सरकारकडून फक्त छळच झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या वर्तणुकीबद्दल माणुसकी कधीही क्षमा करणार नाही, असे उद्गार उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काढले आहेत. महाराष्ट्र सरकारने ‘सावत्र आई’ म्हणून तरी काळजी घ्यायला हवी होती, असा टोला योगींनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना लगावला. दरम्यान, परप्रांती मजुरांच्या स्थलांतर, त्यांची झालेली गैरसोय या मुद्यांवर आता शिवसेना आणि भाजपा आमने-सामने ठाकले असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.
“आपल्या रक्ताचं पाणी करुन महाराष्ट्राला मदत करणाऱ्या कामगारांचा शिवसेना-कॉंग्रेस सरकारकडून फक्त छळच झाला. लॉकडाऊनमध्ये त्यांना फसवले गेले. त्यांना वाईट अवस्थेत सोडून देण्यात आले आणि घरी जाण्यास भाग पाडले गेले. श्रीयुत उद्धव ठाकरे, या अमानुष वर्तनाबद्दल माणुसकी कधीही तुम्हाला क्षमा करणार नाही” असा तोरा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मिरवली.
“आपल्या घरी पोहोचलेल्या सर्व बंधू-भगिनींची उत्तर प्रदेशात काळजी घेतली जाईल. आपल्या कर्मभूमीला सोडण्यास भाग पाडल्यानंतर त्यांच्याबद्दल काळजी करण्याची नाटक करु नका. सर्व कामगारांना विश्वास आहे की आता त्यांची जन्मभूमी त्यांची काळजी घेईल, शिवसेना आणि कॉंग्रेस निर्धास्त रहा” असा घणाघातही योगींनी केला आहे.“संजय राऊतजी, भुकेलेला मुलगा फक्त आपल्या आईला शोधतो. महाराष्ट्र सरकारने अगदी ‘सावत्र आई’ म्हणून पाठिंबा दर्शवला असता, तरी महाराष्ट्राला हातभार लावणाऱ्या उत्तर प्रदेशच्या रहिवाशांना मूळगावी परत यावे लागले नसते.” असेही योगी म्हणाले.