शरद पवारांना लाज, लज्जा, शरम काहीच राहिली नाही – उध्दव ठाकरे   

0
673

बुलडाणा , दि. १३ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना लाज, लज्जा शरम काहीच राहिली नाही,  अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी  केली आहे. तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना ‘बाळा राहुल हे हिंदुस्तान आहे, येथे नामर्दाला जागा नाही’ असे म्हणत देशद्रोहाला जवळ करणाऱ्यांना तुम्ही निवडून देणार का? असा सवाल ठाकरे यांनी केला.

खामगावमध्ये  बुलडाणा लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारासाठी आयोजित  सभेत ठाकरे बोलत होते.

यावेळी ठाकरे म्हणाले की, काश्मीरमध्ये ३७० कलम आम्ही काढणार नाही, असे म्हणत आहेत. या देशातून देशद्रोहचा कलम काढून टाका, असे काही लोकांचे म्हणणे आहे. शरद पवारांना काही लाज, लज्जा शरम राहिलीच नाही, त्यामुळे मी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मतदारांना विचारतोय तुम्हाला हे चालेल का, असे ठाकरे यावेळी  म्हणाले.

उद्या दाऊद काँग्रेसमध्ये आला, तर त्याला काँग्रेसवाले दाऊदजी असे म्हणतील.  शिवसेना भाजपचे नाते खट्टंमीठं होते, त्यामुळे मधे थोडे काम कमी झाले असेल, पण आता युती झाली आहे, त्यामुळे तुम्हाला सगळे गोड  मिळेल, असे ते म्हणाले.