वर्धा, दि. १ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कौटुंबिक लढाई सुरु आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे पुतणे राष्ट्रवादीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळेच तिकीट वाटपात अडचणी येत आहेत. अजित पवारांच्या हातून शरद पवार हिटविकेट झाले आहेत, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी आज (सोमवार) पवारांवर निशाणा साधला.
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज वर्ध्यातून महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. वर्ध्याच्या स्वावलंबी विद्यालयाच्या मैदानावर जाहीर सभेत बोलताना मोदी यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
यावेळी बोलताना मोदी म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या गृहयुद्ध सुरु आहे. शरद पवार यांची पक्षावरील पकड सैल होत आहे. आता परिस्थिती अशी आहे की, त्यांचे पुतणे हळूहळू पक्षावर ताबा मिळवत आहेत. त्यामुळेच राष्ट्रवादीला तिकीटवाटपातही अडचणी येत आहेत.