वर्धा, दि. १ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना लोकसभा निवडणुकीत वाऱ्याची दिशा कोणत्या दिशेने आहे, हे समजल्याने पवारांनी मैदानातून पळ काढला, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (सोमवार) येथे केली.
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज वर्ध्यातून महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. वर्ध्याच्या स्वावलंबी विद्यालयाच्या मैदानावर जाहीर सभेत बोलताना मोदी यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर चौफेर हल्ला चढवला.
यावेळी मोदी म्हणाले की, एक काळ होता की आपणही पंतप्रधान बनू असा विचार शरद पवार करत होते. लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणाही त्यांनी केली. पण अचानक एक दिवस म्हणाले की, मी तर राज्यसभेतच खूश आहे, मी निवडणूक लढवणार नाही. त्यांनीही माहिती आहे की, वाऱ्याची दिशा कोणत्या दिशेने आहे.