विद्यार्थी हा बंडखोर असला पाहिजे, गुणवान होण्यासोबतच धाडसीही बनावे – आमदार लक्ष्मण जगताप

0
1376

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – प्रत्येक विद्यार्थ्याने बंडखोर असले पाहिजे. विद्यार्थ्यांना सातत्याने प्रश्न पडले पाहिजेत. वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण कल्पना सुचल्या पाहिजेत. प्रश्न पडले, तर विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक वाढतो. विद्यार्थ्यांनी गुणवान होण्यासोबतच धाडसीही बनले पाहिजे, असे मत भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी शनिवारी (दि. २२) व्यक्त केले.

जिजाई प्रतिष्ठान आणि पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे यांच्या वतीने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित परीक्षापूर्व मार्गदर्शन शिबीराचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रकाश मीठभाकरे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, माजी उपमहापौर शैलजा मोरे, सीमा सावळे, नगरसेविका आशा शेंडगे-धायगुडे, शर्मिला बाबर, नगरसेवक शीतल शिंदे, भाजपचे शहर सरचिटणीस सारंग कामतेकर, भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस अनुप मोरे, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे शिक्षणाधिकारी पराग मुंढे, अनारसे सर, वाळके सर, ढोकळे सर, संतोष पाचपुते आदी उपस्थित होते.

आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, “सीमा सावळे, सारंग कामतेकर, आशा धायगुडे-शेंडगे व त्यांचे सहकारी शिक्षक पिंपरी-चिंचवडची गुणवत्ता वाढावी, बौद्धिक श्रीमंत वाढावी यासाठी सातत्याने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन करतात. विद्यार्थ्यांनी आपली स्मरणशक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. स्मरणशक्ती वाढली की बुद्ध्यांक आपोआप वाढतो. तसे झाल्यास प्रत्येक विद्यार्थी शैक्षणिकदृष्ट्या तसेच आयुष्यातही यशस्वी होऊ शकतो. विद्यार्थ्यांनी शैक्षणिकदृष्ट्या गुणवान होण्यासोबतच धाडसीही होणे गरजेचे आहे. धाडस नसेल, तर आपली गुणवत्ता वंचित राहते, बुद्धिवंतांची चेष्टा होते. विद्यार्थ्यांनी काही गोष्टी आपले पालक आणि शिक्षकांकडून आत्मसात कराव्यात, काही गोष्टी स्वतःहून आत्मसात कराव्यात. आपला देश सुजलाम सुफलाम होण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.”

स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे प्रास्ताविक करताना म्हणाल्या, “विद्यार्थ्यांसाठी गेल्या १४ वर्षांपासून या उपक्रमाचे सातत्याने आयोजन केले जात आहे. आम्ही राजकारणी असलो तरी विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम आमचेही आहे, या उद्दात्त हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. आमदार लक्ष्मण जगताप यांनीही मोठ्या स्वरुपात हा कार्यक्रम घेण्याचे सुचविले. सर्व शाळांना बोलावण्याची सूचना केली. त्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षापूर्व मार्गदर्शन करण्याचा कार्यक्रम गेली १४ वर्षे यशस्वीपणे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.”

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रकाश मीठभाकरे यांनीही यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी दहावीच्या मुलांनी “उत्तरपत्रिका कशी लिहावी” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरसेविका आशा धायगुडे-शेंडगे यांनी केले. भाजपचे शहर सरचिटणीस सारंग कामतेकर यांनी आभार मानले.