वनमंत्री संजय राठोड यांचा खुलासा…’मी गायब नव्हतो झालो तर……’

0
263

मुंबई, दि.२३ (पीसीबी) : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर राज्याचे वनमंत्री संजय राठोड हे आज पहिल्यांदा प्रसारमाध्यमांसमोर आले आणि या सर्व प्रकरणावर त्यांनी मौन सोडलं. पूजा चव्हाण प्रकरणामध्ये त्यांचं नाव समोर आल्यानंतर भाजपने त्यांच्या राजीनाम्याची मागणी उचलून धरली. मात्र मुख्यमंत्र्यांनी राठोड यांच्या बाबतीत खूप संयमी भूमिका घेतली. आज तब्बल १४ दिवसानंतर पोहरादेवीत राठोड यांनी दाखल होऊन दर्शन घेतल्यानंतर आपली भूमिका त्यांनी स्पष्टपणे मांडली. गेल्या १४ दिवसांपासून संजय राठोड अज्ञातवासात गेल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, त्यावर बोलताना संजय राठोड यांनी ‘मी १४ दिवस नाही, तर फक्त १० दिवस माध्यमांपासून दूर गेलो होतो, पण मुंबईतल्या माझ्या फ्लॅटमधून माझं प्रशासकीय काम सुरूच होतं’, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे.

तेव्हा त्यांना माध्यमांनी विचारल कि, पूजा चव्हाण प्रकारणांनंतरच तुम्ही गायब असल्याची चर्चा सुरु झाली होती. त्यावर ते म्हणाले, ‘तुम्ही सांगता त्याप्रमाणे मी १४ नाही तर फक्त १० दिवस माध्यमांपासून लांब होतो. प्रसारमाध्यमांमध्ये ज्या पद्धतीने या प्रकरणाची चर्चा होऊन माझी बदनामी होत होती. त्या पार्श्वभूमीवर माझ्या कुटुंबासोबत, आई-वडिलांसोबत, पत्नी आणि मुलांसोबत मी थांबलो होतो. त्यांना मी वेळ देत होतो. माझे वयोवृद्ध आई-वडील आहेत. माझ्या पत्नीला देखील ब्लड प्रेशर आहे. या काळात माझं कुटुंब सांभाळण्याचं काम मी करत होतो’, असं ते म्हणाले.