पुणे, दि. ९ (पीसीबी) – राज्यात आम्ही लोकसभेच्या ४८ जागांवर संपूर्ण ताकदीने लढत आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शनिवार) सुचक विधान केल्याने भाजप –शिवसेना युती होण्याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. राज्यात भाजप-शिवसेना युती होण्याबाबत संभ्रमावस्था असताना मुख्यमंत्र्यांच्या विधानामुळे युतीची शक्यता धूसर झाली आहे.
पुण्यात शक्ती केंद्र प्रमुखांच्या संमेलनात भाजप अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी मा्र्गदर्शन केले. त्यावेळी फडणवीस यांनी भाजप-शिवसेना युतीची शक्यता फेटाळून लावली.
फडणवीस म्हणाले की, आम्ही पूर्ण ताकदीने ४८ जागांवर लढतोय. रावसाहेब दानवे सांगतात ती ४३ वी जागा बारामतीची असती. आता यावेळी चूक करायची नाही. बारामतीत फक्त कमळ फुलेल. इतकेच काय तर लोकसभेच्या तेथील तिन्ही मतदारसंघांमध्ये कमळच फुलणार आहे, असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.