राफेलप्रकरणी मोदींनी गंगेत डुबकी घेऊन पापक्षालन करावे – काँग्रेस

0
624

नवी दिल्ली, दि. १६ (पीसीबी)  – राफेल करार प्रकरणी मोदी सरकारकडून सर्वोच्च न्यायालयाला चुकीची माहिती दिली आहे. त्यामुळे न्यायालयाने या प्रकरणातील आपला निर्णय मागे घ्यावा. त्याचबरोबर न्यायालयाने मोदी सरकारला शपथेवर खोटी साक्ष देणे आणि न्यायालयाच्या अवमाननेप्रकरणी नोटीस द्यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

पंतप्रधान मोदींनी रविवारी सोनिया गांधी यांचा मतदारसंघ रायबरेली येथे राफेलवर सुरु असलेल्या वादावरुन काँग्रेसवर टीका केली होती. त्यानंतर काँग्रेसने पत्रकार परिषद घेऊन मोदींना चोख शब्दात प्रत्युत्तर दिले आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा म्हणाले की, राफेल विमानांच्या किंमतीवरुन कॅगचा अहवाल संसदेच्या लोकलेखा समितीसमोर सादर केल्याचे सांगून सरकारने विशेषाधिकाराचा अवमान केला आहे. ते कुंभच्या धार्मिक यात्रेवर जातानाही खोटं बोलत आहेत. त्यांनी पापक्षालन करायला हवे, त्यांनी पवित्र गंगा नदीत जाऊन स्नान केले पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला.