राज ठाकरेंच्या घणाघाती टीकेनंतर मनसेने दिले भाजपला आव्हान   

0
667

मुंबई, दि. ७ (पीसीबी) – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यात पंतप्रधान मोदी आणि भाजप पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यावर हल्ला चढवला होता. त्यानंतर आता तुमच्यात हिम्मत असेल तर मोदींवर केलेले आरोप खोटे ठरवून दाखवा, असे थेट आव्हान मनसे नेते संदिप देशपांडे यांनी भाजपला दिले आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधान हवेत का?  ते आधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष  शरद पवार यांना विचारा. नाहीतर पुढच्या वेळी स्क्रिप्ट मिळणार नाही, अशी टीका आज (रविवार) भाजप नेते व शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी राज ठाकरे यांच्यावर केली होती.  या टीकेला देशपांडेंनी  चोख प्रत्युत्तर दिले आहे.

जर आम्ही केलेले आरोप खोटे निघाले, तर मी राजकारण सोडेन पण जर खरे निघाले, तर तावडे यांनी राजकारण सोडावे, असेही आव्हान  संदीप देशपांडे यांनी दिले आहेत. दरम्यान, राज ठाकरे यांनी भाजपविरोधात आणखी ८ ते ९ सभा घेणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे राज आणि भाजप यांच्यामध्ये कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.