“राज्यात युतीचंच सरकार येणार; आम्हाला सत्तेची हाव नाही – उध्दव ठाकरे

0
405

मुंबई, दि.७ (पीसीबी) – येणार तर युतीचंच सरकार येणार असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर बोलताना उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी युतीवर शिक्कामोर्तब केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते महामुंबईचे संपर्कजाळे वाढविणाऱ्या मेट्रो प्रकल्पाच्या विस्ताराचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं.

“राज्यात युतीचंच सरकार येणार आहे. आम्हाला सत्तेची हाव नाही, मात्र राज्याचा विकास कऱण्यासाठी सत्ता हवी आहे. एक चांगलं आणि मजबूत सरकार राज्यात येणार आहे,” असं यावेळी उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

उद्धव ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात करताना मोदीजी मला तुमचा अभिमान असल्याचं सांगत त्यांचं अभिनंदन केलं. “मोदीजी मी किती गोष्टींसाठी तुमचं अभिनंदन करु. गेली अनेक वर्ष ज्या गोष्टी आपण बोलत होतो त्या गोष्टी करुन दाखवल्या आहेत,” असं सांगताना उद्धव ठाकरे यांनी कलम ३७० चा उल्लेख केला. “काश्मीर अविभाज्य घटक होता, आहे आणि राहणार आणि हे नरेंद्र मोदींनी सिद्ध करुन दाखवलं,” असल्याचंही यावेळी उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

नरेंद्र मोदींचं कौतुक करताना आमच्यामधे ताकद आहे त्या ताकदीचा सदुपयोग कऱणारा आणि त्यासाठी मार्गदर्शन करणारा नेता आम्हाला सापडला आहे. देशाच्या अस्मितेचे विषय आपण सक्षमतेने हाताळत आहात. मोदींच्या रुपाने देशाला समर्थ नेतृत्त्व मिळालं आहे असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. “नरेंद्र मोदींनी चंद्रालाही गवसणी घातली आहे.” असंही कौतुक यावेळी उद्धव ठाकरेंनी केलं. उद्धव ठाकरेंनी यावेळी आता समान नागरी कायदा आणि राम मंदिराचं स्वप्नही पूर्ण करू असा निर्धार व्यक्त केला.