नवी दिल्ली, दि. ८ (पीसीबी) – पंतप्रधान मोदी यांना लोकांची मने दुखावतील, अशी आक्षेपार्ह विधान करण्यापासून रोखण्यात यावे, अशी मागणी अमेठीतील एका तरूणाने निवडणूक आयोगाकडे केली आहे. याबाबत मनोज कश्यप या तरूणाने चक्क आपल्या रक्ताने पत्र लिहिले आहे.
अमेठीतील शाहगडचा मनोज रहिवासी आहे. पंतप्रधान मोदी यांनी माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधींविरोधात केलेल्या विधानामुळे आपल्याला खूप मोठा धक्का बसला आहे, असेही मनोज कश्यप यांनी म्हटले आहे. जी व्यक्ती राजीव गांधींचा अपमान करते, ती अमेठीतील लोकांसाठी त्यांची हत्या करणाऱ्यांचा नातेवाईक आहे. राजीव गांधी अमेठीतील आणि देशभरातील लोकांच्या ह्रदयात राहतात, असेही मनोज कश्यप यांनी म्हटले आहे.
मनोज कश्यप यांनी पत्रात लिहिले आहे की, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी मतदानाचे वय १८ पर्यंत आणले, त्यांनी पंचायत राज प्रणाली आणली आणि देशात संगणक क्रांतीही त्यांच्यामुळेच आली. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनीदेखील आपल्या एका लेखात राजीव गांधी यांचे कौतुक केले होते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.