…या कारणामुळे माझ्यावर हल्ला झाला असावा – रामदास आठवले

0
2820

मुंबई, दि. ९ (पीसीबी) – अंबरनाथ येथे एका तरूणाने केलेल्या हल्ल्यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रीया देलेली आहे. या हल्ल्यामागील कारण   माझ्या वाढत्या लोकप्रियतेत आहे. त्यामुळे दु:स्वास करणाऱ्यांनी माझ्यावर हल्ला केला असावा, अशी शक्यता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज (रविवार) येथे  व्यक्त केली आहे.

पोलिसांनी पुरेशी सुरक्षा व्यवस्था न ठेवल्याने हा हल्ला झाला असावा, असा आरोपही त्यांनी केला आहे. यासंबंधी मुख्यंत्र्यांची भेट घेणार आहे, असे त्यांनी सांगितले.  कार्यकर्त्यांनी शांतता ठेवावी,  असे आवाहन त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले आहे. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी आठवले यांच्या वांद्रे येथील  बंगल्याची सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.

दरम्यान, आठवले अंबरनाथमध्ये एका कार्यक्रमाला आले होते. त्यावेळी स्टेजवरून खाली उतरताना  प्रविण गोसावी या तरुणाने आठवलेंना धक्काबुक्की करत कानशिलात लगावली. त्यानंतर आठवलेंच्या कार्यकर्त्यांनी प्रविणला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला आहे. हा प्रकार  शनिवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास अंबरनाथ येथे घडला होता.