‘….म्हणून सुनील शेळके, बाळा भेगडे आपसांत भिडले’

0
485

पुणे, दि. १० (पीसीबी) : मावळ तालुक्यातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनात आजी-माजी आमदार भिडल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार सुनील शेळके आणि भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. मावळ तालुक्यातील तळेगाव एमआयडीसीमधील चौथ्या टप्प्यातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यानी विविध मागण्यांबाबत रास्ता रोको आंदोलन केलं. या आंदोलनात आमदार सुनील शेळके आणि माजी आमदार बाळा भेगडेही सहभागी झाले होते.

तळेगाव एमआयडीसी टप्पा क्रमांक 4 कायमस्वरुपी रद्द करण्यासाठी, शेतकऱ्यांच्या सातबारावर टाकलेले 32 (2) चे शिक्के काढण्यासाठी तळेगाव एमआयडीसीमधील शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन पुकारलं होतं. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सुनील शेळके यांनी बाळा भेगडे सहभागी झाले होते. त्यावेळी या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर टिप्पणी केल्यामुळे दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यावेळी काही काळ वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं. मात्र, शेतकऱ्यांच्या आंदोलनानं आजी-माजी आमदारांमध्येच जुंपल्यामुळे त्याच विषयाची चर्चा अधिक होत आहे.

आंदोलनात सहभागी झाल्यानंतर विद्यमान आमदार सुनील शेळके यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. त्यावेळी आपल्या भाषणात माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या असा गंभीर आरोप केला. त्यानंतर माजी राज्यमंत्री बाळा भेगडे हे बोलण्यासाठी उभे राहिले. त्यावेळी राष्ट्रवादीच्या आमदारांनी सगळ्या शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घेऊन त्यांना पैसे द्यावे, असं वक्तव्य केलं. त्यानंतर सुनील शेळके यांनी वैयक्तिक बोलू नका असं सांगितल्यानंतर भेगडे आणि शेळके यांच्यात जुंपल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या लोकप्रतिनिधींनी एकमेकांची उणीदुणी काढल्याचं पाहून शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

मावळमधील इंद्रायणी भाताची हजारो हेक्टर शेती उद्ध्वस्त
मावळ तालुक्याला भात पिकाचे आगार म्हटले जाते. तालुक्यात 12 हजार हेक्टरपेक्षा अधिक जागेवर भात पिकाची शेती केली जाते. परंतु गेल्या चार-पाच दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे मावळातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. अंदर मावळ तसेच पवन मावळ या दोन्ही पट्ट्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात इंद्रायणी भाताचे पीक घेतले जाते.

या भागात पावसाचे प्रमान जास्त असल्याने प्रामुख्याने मावळ भागातील शेतकरी हा भात पीक घेत असतो. मात्र, जुलैच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या पावसाने शेतकरी हतबल झालाय. मावळ भागात मुसळधार पावसामुळे धबधब्यांना यंदा पाचपट जास्त पाणी आल्याने डोंगर दऱ्याखोऱ्यातील माती दगड मोठ्या प्रमाणात वाहून आली. त्यामुळे भात खाचरांवर पूर्णपणे गाळ साचला आहे. परिणामी भात पीक पूर्णपणे नष्ट झाले आहेत यंदा तालुक्यात सरासरीपेक्षा भात पिकाचे उत्पन्न देखील घटणार आहे.