मोदी सरकारने इंग्रजांपेक्षा वेगळे नाही, हे दाखवून दिले – काँग्रेस

0
564

नवी दिल्ली, दि. २ (पीसीबी) – दिल्लीत शेतकऱ्यांवर लाठीमार करून महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या दिवशी मोदी सरकारने ते इंग्रजांपेक्षा वेगळे नाहीत, हे दाखवून दिले आहे. इंग्रजांनी आधी शेतकऱ्यांचे शोषण केले होते. आता मोदी सरकारही शेतकऱ्यांवर अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर करत आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे.

आज (मंगळवारी) दिल्लीच्या सीमेवर धडक दिलेल्या शेतकऱ्यांच्या मोर्चाला पोलिसांनी रोखले. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून त्यांच्यावर पाण्याचा माराही केला. या घटनेनंतर काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी भाजप सरकारची तुलना थेट इंग्रजांशी केली आहे.

हजारो शेतकरी आपल्या मागण्या घेऊन शेकडो किलोमीटर चालत तुमच्या दारी आले. जर तुम्ही खरेच महात्मा गांधी यांचे विचार आत्मसात केले असते, तर तुम्ही शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करण्याऐवजी त्यांच्या मागण्या मान्य केल्या असत्या. आता लवकरच ‘शेतकरी विरोधी – नरेंद्र मोदी’, हा नवा नारा ऐकू येईल, असे काँग्रेसने म्हटले आहे.