नवी दिल्ली, दि. ९ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी आमचे डॅडी आहेत, असे अण्णाद्रमुक पक्षाचे नेते आणि मंत्री केटी राजेंद्र बालाजी यांनी म्हटले आहे. दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांनी राष्ट्रीय पक्षांशी आघाडी करण्याचे टाळलेले होते. आता अण्णाद्रमुकने लोकसभेसाठी भाजपशी कशी काय आघाडी केली? या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी मोदी आमचे डॅडी असल्याचे म्हटले.
अम्माचं (जयललिता) निधन झाल्यापासून मोदी यांनीच डॅडींप्रमाणे पक्षाचे मार्गदर्शन केले. त्यामुळे ‘हो नक्कीच…मोदी आमचे डॅडी आहेत. जेव्हापासून आम्ही आमच्या अम्माला गमावले तेव्हापासून पंतप्रधान मोदींनी डॅडींप्रमाणे आम्हाला पाठिंबा दिला आणि मार्गदर्शन केले, असे ते म्हणाले.
मोदी फक्त अण्णाद्रमुकचे डॅडी नाहीत, तर देशाचेही डॅडी आहेत. यामुळेच अण्णाद्रमुकने भाजपाशी आघाडी केली आहे’, असे बालाजी यांनी सांगितले. दरम्यान, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत जयललिता यांनी ‘तामिळनाडूची लेडी किंवा गुजरातचे मोदी’ अशी घोषणा दिली होती.