‘मुंडे यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही’ – शरद पवार

0
245

– राष्ट्रवादी काँग्रेस फुटीच्या शक्यतेमुळे धनंजय मुंडें बालंबाल वाचले

मुंबई, दि. १५ (पीसीबी) मी कालंच सांगितलं आहे की, हा प्रश्न गंभीर आहे. महिलेने केलेल्या तक्रारीचं स्वरुप गंभीर आहे. याबाबतीत सर्व मिळून निर्णय घेण्यात येईल. काल या गोष्टीवर सविस्तर विचारविनिमय केला आहे. महिलेने तक्रार केल्यानंतर मीडियातून आणखी नवीन गोष्टी समोर आल्या आहेत. आता त्याबाबत पोलिस चौकशी सुरू आहे. सत्य समोर आल्यावर पुढील निर्णय होईल. राजीनामाचा प्रश्नच निर्माण होत नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दुपरी माध्यमांशी बोलताना सांगितले. दरम्यान, मुंडे यांच्या राजीनाम्या बाबत पवार यांनी तलवार म्यान कऱण्यामागे नेमके कारण शोधण्याचा आटापीटा सुरू आहे. या विषयावर अजित पवार समर्थक ठामपणे मुंडे यांच्या पाठिशी राहिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस फुटीची शक्यता निर्माण झाली होती म्हणूनच पवार यांनी अत्यंत शिताफिने आपला निर्णय फिरविला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

शरद पवार म्हणाले, या प्रकरणावर पोलीस विभाग चौकशी करत आहेत. या बाबतीत आम्ही हस्तक्षेप करण्याचं कारण नाही. चौकशी करताना एखादी एसीपी लेव्हलची महिला अधिकारी त्यात असावी असं मला वाटतं. या महिलेने मुंडेंसह इतरांची माहिती घेऊन वस्तुस्थिती पुढे आणावी आणि हे याबाबतीत सत्य समोर आणावं. महिलेच्या बाबतीत भाजपच्या एका नेत्याने स्टेटमेंट दिलं आहे. यामध्ये काळजीपूर्वक चौकशी करावी असं त्यांनी सांगितलं. काही भाजप नेते आरोप करत आहेत. त्यांना टीका करायची असेल त्याबाबत माझं काही म्हणणं नाही. मात्र, वस्तिस्थिती समोर यावी असं आमचं म्हणणं आहे.

काल मी या प्रकरणावर बोललो तेव्हा संपूर्ण चित्रं माझ्यासमोर नव्हतं. एखाद्या भगिनीने तक्रार केल्यावर तिची दखल घेतली. त्यामुळे गंभीर हा शब्द वापरला आता सर्व चौकशी करावी आणि कुणावरही अन्याय होऊ नये असं वाटतं.

मुंडे यांचा राजीनामाचा घ्यावा किंवा नाही. यावर मतभिन्नता असू शकते. आरोप करणाऱ्या महिलेच्या बाबतीत एकापेक्षा एक अधिक गोष्टी पुढे आल्यानंतर त्यातील सत्यता समो आली पाहिजे. नाही तर कुणावरही आरोप करायचे आणि त्या व्यक्तीला सत्तेपासून दूर करायचं अशी प्रथा पडू शकते. त्यामुळे या घटनेतील सत्य समोर यायला व्हावं, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.

गुन्हा दाखल करण्याचं काम पोलिसांचं आहे. पोलिसांनी या प्रकरणात खोलात जाऊन तपास करावा. जोपर्यंत सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही. या आरोपामधील सत्य बाहेर आल्यावर निर्णय घेता येईल. आरोप झाल्यावर संयम ठेवावा लागतो. सत्यता बाहेर येईपर्यंत थांबावं लागतं. शपथपत्रात मुंडेंनी माहिती लपवली की नाही हे पाहावं लागेल. देशात अशा अनेक गोष्टी झालेल्या आहेत. देशातील सर्वोच्च प्रमुखांच्याबाबतीतही अशा गोष्टी झाल्या आहेत. त्याच्या खोलात जायची गरज नाही. मात्र सत्ता हातातून गेल्याने काही जण अस्वस्थ आहेत, असे सांगत पवार यांनी नाव न घेता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाना साधला.