उत्तरप्रदेश, दि.०७ (पीसीबी) : माणुसकीला काळिमा फासणारी घटना उत्तरप्रदेशात घडली असून प्रेम प्रकरणाला विरोध करणाऱ्या वडिलांना मुलगी, मुलगा आणि पत्नीकडून जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यात ही संतापजनक घटना घडली. या घटनेतील सर्व आरोपी फरार असून पीडित व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती गंभीर आहे.
पोलिसांच्या दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद आमिर (वय ५५) असं पीडित व्यक्तीचं नाव असून ही व्यक्ती आणि त्याचं कुटुंब बदायूं जिल्ह्यातील वजीरगंजच्या हतरा नामक गावात राहतात. पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा आमिर यांच्या कुटुंबात आहे. शेती करुन हे कुटुंब आपला उदरनिर्वाह करतात.
या घटनेची माहिती एका अज्ञात व्यक्तीनं पोलिसांना दिली. हि माहिती कळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यावेळी आमिर ५० टक्के भाजलेल्या अवस्थेत जमिनीवर पडलेले होते. त्यांना ताशा गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, पीडित व्यक्तीचा जबाब नोंदवण्यात आला आहे.
त्यांनी आपल्या जबाबात म्हटलं आहे की, “माझ्या मुलीचे कोणाशी तरी प्रेम संबंध होते. मी याला विरोध केला तर माझा मुलगा-मुलगी, पत्नी आणि भाच्याने माझ्यावर पेट्रोल टाकून पेटवलं, त्या सर्वांना वाटतं की मरावं.” दरम्यान या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस अधीक्षक सिद्धार्थ वर्मा म्हणाले, “आम्हाला याप्रकरणी कोणतीही तक्रार मिळालेली नाही. त्यामुळे अद्याप गुन्ह्याची नोंद झालेली नाही. मात्र, आम्ही आरोपींचा शोध सुरु केला आहे.” डॉक्टरांचं आमिर यांच्या प्रकृतीकडे लक्ष असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे. पोलीस पुढील तपस करत आहेत.