महाराष्ट्रातील वाढत्या कोरोनाबाबत मोदींनी केली चिंता व्यक्त; उद्धव ठाकरेंनी केंद्रालाच केली विनंती. म्हणाले,….

0
308

मुंबई, दि.१६ (पीसीबी) : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशातील सर्वाधिक करोना रुग्णसंख्या असलेल्या ६ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. त्यामध्ये अर्थातच महाराष्ट्राचाही समावेश होता. या चर्चेमध्ये मोदींनी महाराष्ट्रात वाढणाऱ्या रुग्णसंख्येविषयी चिंता व्यक्त केली. त्यावर बोलताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उलट केंद्रालाच विनंती करून व्यापक धोरण आखण्याची मागणी केली आहे. “कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करताना वाढणारी गर्दी हे एक मोठे आव्हान आहे. या दृष्टीने धार्मिक, सामाजिक कारणे तसेच राजकीय कार्यक्रम, आंदोलने यामुळे विविध ठिकाणी होणारी गर्दी थांबविण्यासाठी केंद्र सरकारनेच आता देशपातळीवर एक व्यापक धोरण आणावे”, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राप्रमाणेच इतरही ठिकाणी गर्दी होत असून अनेक कारणांसाठी लोक एकत्र येत असल्याचं पंतप्रधानांच्या निदर्शनास आणून दिलं. पंतप्रधान कोरोना परिस्थितीत राज्याला वेळोवेळी मार्गदर्शन करतात यासाठी आभार मानून मुख्यमंत्री म्हणाले की, “दुसऱ्या लाटेचे शेपूट देखील अद्याप वळवळते आहे. असे असतांना रुग्णसंख्या घटत असली तरी पूर्णपणे कमी झालेली नाही. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर सर्वच ठिकाणी लोक घराबाहेर पडताहेत, गर्दी करताहेत रिव्हेंज टुरिझम, रिव्हेंज शॉपिंग सुरु झाले आहे. धार्मिक, राजकीय कारणांसाठी गर्दी होऊ लागली आहे. हे थांबविण्यासाठी राज्य प्रयत्न करते आहेच, पण केंद्रीय पातळीवरून देखील आपल्याला काही व्यापक स्वरूपाचे धोरण आखावे लागेल”. दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र सज्ज असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगितलं. “कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेचा मुकाबला करण्यासाठी महाराष्ट्र सज्ज असून उद्योगांना फटका बसू न देण्यासाठी तशा उपाययोजना करण्यात येत आहेत. महाराष्ट्रात रुग्ण संख्या आणि मृत्यू दर कमी होत असला तरी आणखीही कमी होण्याची गरज आहे. फ्रंट लाईन वर्कर्सचे लसीकरणही वेगाने पूर्ण करीत आहोत, लसी वाया जाण्याचे प्रमाणही कमी केले आहे”, असे मुख्यमंत्री म्हणाले.

सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील मिळून ८ ते १० जिल्ह्यांमध्ये अध्यापही संसर्ग आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले कि, “या जिल्ह्यांमधील १८ वर्षांपुढील २.०६ कोटी जणांना पूर्ण दोन्ही डोस देणे गरजेचे आहे. सध्या ८७.९० लाख डोस इथे दिले आहेत. त्यामुळे जादाचे ३ कोटी डोस मिळाले तर प्राधान्याने या सर्व जिल्ह्यांत संपूर्ण लसीकरण करता येईल”. तसेच, “मोनोक्लोनल एन्टीबॉडीज हे सध्या उपचारांमध्ये प्रभावी आहे मात्र त्याची किंमत ५० ते ६० हजार प्रती डोस असून तिसऱ्या लाटेत ५० हजार रुग्णांना जरी हे औषध द्यायचे म्हटले तर ३०० कोटी रुपये लागतील. याचा विचार करून केंद्र सरकारने या औषधांवर किंमतीचे निर्बंध आणावेत, तसेच त्याची सहज उपलब्धता होईल हे पाहावे”, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

“केंद्राने दिलेल्या प्रमाणानुसार विचार करता, संभाव्य तिसऱ्या लाटेत राज्याला दररोज सुमारे ४ हजार मेट्रिक टन ऑक्सिजन आवश्यकता भासेल. आम्ही २ हजार मेट्रिक टन उत्पादन करू शकतो. उर्वरित २ हजार मेट्रिक टन ऑक्सिजन नजीकच्या राज्यातून झाला तरच मोठी मदत होईल. भिलाई, जामनगर, बेल्लारी स्टील प्लांट या ठिकाणाहून एलएमओ महाराष्ट्राला मिळण्यासाठी केंद्राने सहाय्य करावे. राज्यात प्रत्येक जिल्ह्यात ५३० पीएसए ऑक्सिजन प्लांट्स उभारणे सुरु असून जिल्हानिहाय ऑक्सिजन व्यवस्थापन नियोजन केले आहे”, असं यावेळी उद्धव ठाकरे पंतप्रधानांना म्हणाले