भाजपाचे निबांळकर, गोरे, कुल राज्यपालांना भेटले, कोरोना हाताळण्यात बेफिकीरी असल्याचे गाऱ्हाणे

0
370

मुंबई, दि. २७ (पीसीबी) : राजभवनात दिग्गज नेत्यांचा राबता सुरु असतानाच भाजपच्या आमदार-खासदारांनी राज्यपाल भगसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, आमदार राहुल कुल यांनी काल राजभवनला जाऊन राज्यपालांची भेट घेतली. ‘कोरोना’संदर्भात सविस्तर चर्चा करुन यामध्ये तातडीने लक्ष घालण्याची विनंती त्यांनी केली.

“देशामध्ये कोरोनासारख्या महाभयंकर आजाराने उग्ररुप धारण केले आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 40 टक्के रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र महाविकास आघाडी सरकार ही परिस्थिती हाताळण्यात अत्यंत बेफिकीर दिसत आहे” अशी तक्रार भाजपच्या लोकप्रतिनिधीनी केली.

“परिस्थिती गंभीर होत चालली असताना राज्य सरकारने कोणतेही ठोस निर्णय घेतलेले दिसत नाहीत. मोल मजुरांचा प्रश्न, कोरोना रुग्णांच्या हॉस्पिटलमध्ये असणारी दुरवस्था, रेशन वाटप, व्यवसाय याबाबत सरकारमध्ये कसलाही समन्वय नाही. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन एकमेकांच्या विरोधामध्ये निर्णय घेताना दिसत आहेत. राज्य सरकार विरोधीपक्षाला विश्वासात घेत नाही, विरोधीपक्षाने दिलेल्या सल्ल्यांचा साधा विचारसुद्धा करत नाही, केंद्र शासनाने दिलेली आर्थिक मदत अजून वापरली गेलेली नाही किंवा त्याची माहिती दिली जात नाही, नुसत्या बैठका घेतल्या जातात परंतु निर्णय घेतले जात नाहीत” असे आरोप भाजपच्या आमदार-खासदारांनी केले.

“मुख्यमंत्री कुठे महाराष्ट्रात दौरा करताना दिसत नाहीत, लॉकडाऊनमधून बाहेर पडण्यासाठी सरकारकडे कोणताही ठोस उपाय नाही. त्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे. यावर ठोस भूमिका घेतली जात नाही. कोरोना रुग्णांच्या किती चाचण्या घेतात, हे समजत नाही. राज्य सरकार वस्तुस्थिती लपवत आहे” असा घणाघातही त्यांनी केला.