पिंपरी चिंचवड शहरातील शाळा ‘या’ तारखेनंतर सुरू होणार – महापौर माई ढोरे व सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांची माहिती

0
426

पिंपरी, दि. २८ (पीसीबी) पिंपरी चिंचवड शहरातील रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील 9 वी ते 12 पर्यंतच्या शाळा/ महाविद्यालय उघडण्यासंदर्भात कुठलीही घाई न करता, शहरातील कोरोना रुग्णांची संख्या व परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतरच डिसेंबर महिन्याच्या 13 तारखेनंतरच महापालिका हद्दीतील नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर माई ढोरे व सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुलांच्या पालकांवर किंवा संमतीने शाळा उघडणे चुकीचे होवू शकते. मुळात शाळा उघडल्याने आपण प्रशासन म्हणून मुलांच्या आरोग्याशी खेळ करतो की काय? असा प्रश्न पालकांच्या मनामध्ये निर्माण होवू लागला आहे. डिसेंबर महिन्याच्या 13 तारखेपर्यंत शहरातील कोरोना रुग्णांची संख्या व शहरातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतरच शहरातील शाळा सूरू करण्यात येणार आहे. या अगोदरच शासनाने स्थानिक पातळीवर यासंदर्भात निर्णय घेण्याचे शासन आदेशात नमूद केलेले आहे. त्यामुळे शहरातील कोरोना परिस्थिती लक्षात घेवूनच शाळा उघडण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने, शाळा/ महाविद्यालयातील 9 ते 12 वी चे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची कोविड 19 आजाराबाबत चाचणी करणे आवश्यक आहे. त्यानुसार, रॅपिड अँटिजेन टेस्ट करून कुठलीही लक्षणे नसणाऱ्या शिक्षकांना कामावर हजर होण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. तसेच, विद्यार्थ्यांच्या पालकांचे संमतीपत्र भरून घेतले जाणार आहे. शाळा सुरू करण्यापूर्वी शाळा निर्जंतुकीकरण, तापमान मोजणीसाठी गन, डिजिटल थर्मामिटर, हात धुण्याची व्यवस्था, सोशल डिस्टनसिंग प्लॅन इत्यादी गोष्टींची पूर्तता करण्यात येणार आहे. काही शाळांमधील शिक्षकांची रॅपिड अँटिजेन टेस्ट अद्याप बाकी असल्याने व सद्यस्थितीत कोविड 19 च्या रुग्णांच्या संख्येमध्ये होत असलेली वाढीची परिस्थिती लक्षात घेता दि. 13 डिसेंबर 2020 अखेर पर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमधील 9 वी ते 12 वी पर्यंतच्या सर्व शाळा/ महाविद्यालये बंदचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात आयुक्तांनी आदेश जारी केला आहे. अनेक पालकांचाही मुलांना करोना काळात शाळेत पाठवण्यास विरोध आहे. या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करण्याच्या निर्णयाबाबत पुनर्विचार केला जात आहे,असे महापाैर ढोरे यांनी सांगितले.