नोटबंदी कोणासाठी, मोदींच्या मित्रांची कर्ज माफीसाठी – राहुल गांधी

0
186

नवी दिल्ली, दि. ८ (पीसीबी) – आज नोटबंदीला चार वर्षे पूर्ण झाली आहेत. काळ्या पैशाविरोधात कारवाईची घोषणा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री ८ वाजता नोटबंदीची घोषणा केली. दरम्यान, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारच्या या निर्णयाचा सातत्यानं विरोध केला आहे. नोटबंदीला चार वर्षे पूर्ण झाल्यानंतर राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींच्या या निर्णयावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आणि भारतीय अर्थव्यवस्थेला झालेल्या नुकसानीबाबतही सांगितलं.

राहुल गांधी यांनी यासंदर्भात एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. “नोटबंदी ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विचारपूर्वक उचललेलं एक पाऊल होतं. जेणेकरून सामान्य जनतेच्या पैशांनी मोंदींचे मित्र उद्योगपती यांची लोखो कोट्यवधी रूपयांची कर्ज माफ केली जावी. हे चुकून झालं आहे असं समजू नका, हे जाणूनबुजून करण्यात आलं आहे. हा राष्ट्रीय त्रासाच्या चार वर्षांसाठी तुम्हीही आवाज उठवला पाहिजे,” असंही राहुल गांधी म्हणाले.

“आज भारतासमोर मोठं संकट आहे. सध्या देशात करोनाचा प्रादुर्भाव आहे. प्रश्न हा आहे की बांगलादेशची अर्थव्यवस्था भारताच्या पुढे कशी गेली. एक अशी वेळ होती जेव्हा भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वोत्तम अर्थव्यवस्था होती. अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होण्याचं कारण करोना असल्याचं सरकारकडून सांगितलं जातं. परंतु करोनाचा प्रादुर्भाव बांगलादेशमध्येही आहे. इतर देशांमध्येही आहे. मग भारतच यात मागे कसा राहिला?” असा सवालही राहुल गांधी यांनी यावेळी केला.

“माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी मोटबंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेा दोन टक्क्यांपर्यंत नुकसान होणार असल्याचं सांगितलं होतं आणि तेच आपल्याला पाहायला मिळालं. पंतप्रधान म्हणतात की आम्ही काळ्या पैशाविरोधात लढू. परंतु हा लढा काळ्या पैशाविरोधात नव्हता. हा हल्ला तुमच्यावर होत आहे,” असंही ते म्हणाले. “पंतप्रधान तुमच्याकडून पैसे काढून घेऊन आपल्या ठराविक दोन-तीन मित्रांना देऊ इच्छित आहेत.

नोटबंदीदरम्यान तुम्ही लाईनमध्ये उभे होता. परंतु मोदींचे मोठे उद्योगपती मित्र मात्र उभे नव्हते. तुम्ही तुमचे पैसे बँकांमध्ये टाकले आणि मोदींनी बँकांमधील ते पैसे आपल्या मित्रांना देऊन टाकले. त्यांचं कर्ज माफ केलं. त्यांचं ३ लाख ५० हजार कोटी रूपयांचं कर्ज माफ करण्यात आलं,” असा आरोपही राहुल गांधी यांनी केला.
नोटबंदीनंतर मोदींनी चुकीच्या जीएसटीची अंमलबजावणी केली. मार्ग मोकळा करून दिला. दुकानदारांना संपवून टाकलं. हा मार्ग कोणासाठी त्यांनी मोकळा केला? पंतप्रधानांनी पुन्हा आपल्या ठराविक उद्योगपती मित्रांसाठी याद्वारे मार्ग मोकळा केल्याचंही त्यांनी नमूद केलं.