नेपाळमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती; मृतांची संख्या ४३ वर

0
719

नेपाळ, दि. १४ (पीसीबी) – नेपाळमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. नेपाळमध्ये आलेल्या पुरात बळी पडलेल्यांची संख्या रविवारी ४३ वर पोहचली असून अद्याप २४ हून अधिक जण बेपत्ता आहेत. तर २० जण जखमी झाले आहेत. जखमीवर सरकारी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूर येण्याचा आणि दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. सर्व महत्त्वाच्या महामार्गावरील वाहतुकीचाही बोजवारा उडाला आहे.

पुरामुळे नदीच्या तीरावर राहणाऱ्यांना धोका निर्माण झाला असून मुसळधार पावसाने आतापर्यंत नेपाळमधील ललितपूर, कावरे, कोटांग, भोजपूर, मकानपूर यासह विविध जिल्ह्य़ांमध्ये ४३ बळी घेतले आहेत. त्याचप्रमाणे २० जण जखमी झाले असून २४ हून अधिक जण अद्याप बेपत्ता आहेत. मदतकार्य वेगाने सुरू केले आहे.