“नाना पटोले हे महाराष्ट्रातील पप्पू” भाजप नेत्याचे टीकास्त्र

0
217

मुंबई, दि, १० (पीसीबी) : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर त्यावरून राजकीय चर्चा आणि दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. मंत्रिमंडळ विस्तारानंतर काँग्रेसकडून त्यावर खोचक टीका करण्यात आली होती. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यासंदर्भात भाजपावर तिखट शब्दांमध्ये टीका केली होती. “मंत्रिमंडळ विस्तार करून काहीही फरक पडणार नाही. नुसते डबे बदलून फायदा नाही, इंजिन बदलायला हवं”, असं नाना पटोले म्हणाले होते. तसेच, मंत्री बदलण्याऐवजी थेट पंतप्रधानच बदलायला हवेत, अशी देखील भूमिका नाना पटोले यांनी मांडली होती. त्यावर आता भाजपाकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘पप्पू’ म्हटलं आहे.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात बोलताना नाना पटोले यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. “नाना पटोले हे पप्पू आहेत. केंद्रात जसे एक पप्पू आहेत, तसेच महाराष्ट्रात देखील एक पप्पू आहेत. ते त्यांच्या तोंडाला येईल ते बोलत असतात”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. त्यामुळे आता यावरून राज्यात कलगीतुरा पाहायला मिळू शकतो.

दरम्यान, यावेळी जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यावर ईडीनं आणलेल्या जप्तीसंदर्भात देखील चंद्रकांत पाटील यांनी वक्तव्य केलं आहे. “जरंडेश्वर हे हिमनगाचे टोक आहे. अशा प्रकारे मातीमोल किंमतीने विकल्या गेलेल्या कारखान्यांची चौकशी करा अशी मागणी मी केली आहे. मी जे पत्र केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांना दिलं, ती कारखान्यांची यादी पाच वर्षांपूर्वी अण्णा हजारेंनी तयार केली आहे”, असं चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी राज्यातल्या ३० साखर कारखान्यांची यादी अमित शाह यांची भेट घेऊन दिली असून या कारखान्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर लगेचच अमित शाह यांच्याकडे सहकार मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली. मात्र, मी यादी दिल्यानंतर हे झाल्याच्या चर्चेचा चंद्रकांत पाटील यांनी इन्कार केला. “मी पत्र दिल्यानंतर देशाच्या सहकार मंत्रालयाचा कारभार अमित शाह यांच्याकडे गेला असं नाहीये. याचं नियोजन किमान वर्षभरापूर्वीपासून झालं असेल. या खात्यामुळे देशातील सहकार क्षेत्राला बळकटी मिळेल”, असं चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.