मुंबई, दि, १० (पीसीबी) : मुंबईत ड्रग्स विक्री केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरावरून भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. “मुंबईच्या डोंगरी विभागातील नूर मंजिल इमारतीत सापडलेले ड्रग्स व हत्यारांच्या कारखान्याचे प्रकरण ताजे असतानाच आता मुंबईत विक्रीस बंदी असलेल्या ड्रग्स विक्री रॅकेटचा पदार्फाश झाला आहे. मुंबईत अशा प्रकारे दिवसाढवळ्या अंमली पदार्थ, हत्यारं, ड्रग्सची विक्री सुरू असताना व मुंबईतील सुरक्षेचे धिंडवडे निघत असताना महाराष्ट्राचे गृहमंत्री झोपले आहेत का? मुंबईत आणखी एक २६/११ होण्याची वाट पाहिली जात आहे का?”, असा सवाल भाजपाचे मुंबई प्रभारी व आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.
अतुल भातखळकर यांनी ट्वीट करून गृहमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. “एका आत्महत्या प्रकरणाच्या तपासासाठी राष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दलाचे विशेष पथक मागील वर्षी ऑगस्ट मध्ये महाराष्ट्रात आले होते. या पथकाकडून वर्षभराच्या काळात राज्यातील बॉलीवूड व उद्योग विश्वात वाढत चाललेल्या ड्रग्सच्या रॅकेटचा भांडाफोड करण्यात आला. तसेच मुंबईच्या डोंगरी, मुंबई शेजारील पनवेल, भिवंडी यांसारख्या परिसरात धाडी टाकून अंमली पदार्थ व हत्यारांचे कारखाने असल्याचं उघड केलं होतं. या संदर्भात मी स्वतः मागणी करून मुंबईसह राज्यात वाढत चाललेल्या देशविघातक कृत्यांकडे लक्ष वेधलं होतं. किमान त्यांनंतर तरी राज्याच्या गृह विभागाकडून मुंबईसह महाराष्ट्रातील अंमली पदार्थ व बेकायदेशीर हत्यारं विक्रीची पाळेमुळे शोधून काढण्याची आवश्यकता होती,” असं भातखळकर यांनी म्हटलं आहे.
सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे निघत असताना महाराष्ट्राचे गृहमंत्री झोपा काढतायत.
मुंबईत दिवसाढवळ्या अंमली पदार्थ, हत्यारे सापडतात. खुलेआम ड्रोनची विक्री होते आणि राज्य सरकार फक्त वसुलीत गुंतले आहे.
राज्यात आणखी एक २६/११ घडवण्याची सुपारी घेतली आहे का ठाकरे सरकारने ? pic.twitter.com/zU5JdbA5Ua— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 10, 2021
“काल एका प्रमुख वृत्तपत्रानं मुंबईतील बोरा बाजार, लॅमिंग्टन रोड, गोरेगावच्या मोतीलाल नगर परिसरात स्टिंग ऑपरेशन करून बेकायदेशीररित्या विक्री केल्या जाणाऱ्या ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश केला. धक्कादायक बाब म्हणजे अशा प्रकारे ड्रग्स विक्री करणाऱ्या दलालांचे रॅकेटसुद्धा या स्टिंग ऑपरेशनमधून उघड करण्यात आले आहे. एका वर्तमानपत्राच्या स्टिंग ऑपरेशनमधून एवढं मोठं रॅकेट उघडकीस होऊ शकले तर राज्याच्या गृह विभागाला याची माहिती नसेल काय?,” असा सवाल भातखळकर यांनी उपस्थित केला आहे.
“मुंबईसारख्या शहरात इतकी देशविघातक कृत्ये होत असताना राज्याचा गृह विभाग केवळ बघ्याची भूमिका पार पाडत आहे. वाझे प्रकरणावरून ‘वसुली सरकार’ अशी बिरुदावली मिळालेलं महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून मुंबईत गुन्हेगारीनं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. दिवसाढवळ्या खून, बलात्कार, उद्योजक व राजकीय नेत्यांना खंडणीसाठी धमक्या देणं, अपहरण या आणि अशा गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. राज्याचे गृहमंत्री हे केवळ सुडाचे राजकारण करण्यात मग्न असल्यामुळे किमान राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तरी मुंबईतील वाढत चाललेली आतंकवादी कृत्यं, हत्यारं, अंमली पदार्थ व ड्रग्जची खुलेआम विक्री थांबवून गुन्हेगारी कमी करण्यासाठी विशेष लक्ष द्यावे”, अशी मागणी भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.