देशासाठी भाजप, संघाच्या नेत्यांच्या घरातील कुत्रा तरी मेला आहे का? – मल्लिकार्जुन खरगे

0
482

मुंबई, दि. ५ (पीसीबी) – देशासाठी काँग्रेसच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्यासह असंख्य नेते, कार्यकर्त्यांनी  बलिदान दिले आहे. मात्र, देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी भाजप, राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या नेत्यांच्या घरातील एक कुत्रा तरी मेला आहे का ? असे वादग्रस्त विधान काँग्रेसचे लोकसभेतील नेते आणि महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी केले आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.   

काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला फैजपूर येथून सुरुवात झाली आहे. यावेळी ते बोलत होते. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे- पाटील आदी उपस्थित होते.

काँग्रेसने ७० वर्षांत काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत रेल्वेचे जाळे पसरवले. मोदी केवळ मुंबई ते अहमदाबाददरम्यान बुलेट ट्रेन आणण्याचा नुसताच गाजावाजा करत आहेत. डॉ.  आंबेडकर यांच्या नावाचा भाजप वापर करत असून संविधान फाडणाऱ्यांना हे सरकार पाठिशी घालत आहे. यामुळे त्यांना बाबासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार नाही, असेही खरगे म्हणाले.