दिल्ली जाळणाऱ्यांमध्ये नादिरशहानंतर अमित शहा यांची नोंद होईल – नवाब मलिक

0
380

मुंबई,दि.३(पीसीबी) – दिल्ली जाळणाऱ्यांमध्ये नादिरशहानंतर अमित शहा यांची नोंद होईल असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केलं आहे.

‘इतिहासात नादिरशहाने दिल्ली जाळल्याची नोंद आहे. त्यामुळं आता नादिरशहानंतर अमित शहा यांचे नाव दिल्ली जळीत प्रकरणामध्ये निश्चितपणे नोंदले जाईल,’ अशी खोचक टीका नवाब मलिक यांनी केली आहे.

नागरिकत्व सुधारणा कायद्याचे विरोधक व समर्थकांमध्ये उसळलेल्या दंगलीनं दिल्लीत ४२ हून अधिक बळी घेतले आहेत. ही दंगल हाताळण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना अपयश आल्याची टीका होत आहे. शहा यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सर्वच विरोधकांकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर मलिक यांनी शहा यांच्यावर थेट आरोप केला.

दरम्यान, ‘दिल्ली जळत असताना पोलिसांनी हिंसा करणाऱ्यांवर कारवाई केली नाही. पोलीस ‘मूक दर्शक’ बनून राहिले. यामागे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा कारवाई न करण्याचा आदेश होता हे स्पष्ट दिसत आहे,’ असंही मलिक म्हणाले.