तूर डाळीची शंभरीकडे वाटचाल

0
446

नवी दिल्ली, दि. २० (पीसीबी) – सामान्यांपासून उच्चभ्रूपर्यंत सर्वांसाठी महत्त्वाचा पदार्थ म्हणून गणल्या जाणाऱ्या तूर डाळीचे भाव शंभरीकडे वाटचाल करू लागले आहेत. दीड महिन्यांतच क्विंटलमागे दोन हजार रूपयांची वाढ होऊन घाऊक बाजारात दर्जापासून भाव प्रति किलो ८५ ते ८७ रूपयांवर पोहोचले आहेत. तर किरकोळ बाजारात हे दर ९० ते ९५ रूपये असे आहेत. डाळीप्रमाणेच तुरीचे भावही वाढले आहेत.

तीन वर्षांपूर्वी तूर डाळीचे भाव प्रति किलो १८० २०० रूपयांपर्यंत पोहोचले होते. वाढीव भावामुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट कोलमडले होते. भाव सामान्यांच्या आवाक्यात आणण्यासाठी सरकारने प्रयत्न केले होते, शिवाय आयातही सुरू केली होती. दोन वर्षांपूर्वी तुरीचे उत्पादन जास्त झाल्यामुळे दोन महिन्यातच तूर डाळीचे भाव घाऊक बाजारात दर्जापासून ५० रूपयांपर्यंत कमी झाले होते. भाव कमी झाल्यानंतरही ग्राहकांकडून फारशी मागणी नव्हती. या सर्व घडामोडीचा फटका व्यापाऱ्यांना बसला होता. अनेक दाल मिल बंद पडल्या. त्यामुळे व्यापाऱ्यांनी तूर डाळीचा साठा केलाच नाही. यावर्षी पुन्हा पीक कमी झाले आहे. वाढत्या मागणीमुळे भाव पुन्हा वाढले आहेत.