…तर भाजपाने महात्मा गांधींच्या मारेकऱ्यांनाही उमेदवारी दिली असती – ओवैसी

0
347

औरंगाबाद, दि. २० (पीसीबी) – भाजपाने भोपाळमधून बॉम्बस्फोट आणि दहशतवादासारखे गंभीर आरोप असलेल्या महिलेला तिकीट दिले आहे. साध्वी प्रज्ञा सिंह यांना उमेदवारी देऊन भाजपाला धर्मयुद्ध छेडायचे आहे. बॉम्बस्फोटात मृत्यू पावलेल्या आणि जखमी झालेल्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार असून मुस्लिमांनी हा प्रकार विसरु नये. महात्मा गांधी यांना मारणारे कोण होते, त्यापैकी कोणी आज जिवंत असते तर त्यालाही साध्वी प्रज्ञासिंहप्रमाणे भाजपाने तिकीट दिले असते, अशी टीका एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी केली आहे.

एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आमदार इम्तियाज जलील यांच्या प्रचारार्थ ओवैसी यांनी औरंगाबादमध्ये सभा घेतली. या सभेत त्यांनी मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह यांना भोपाळमधून भाजपाने उमेदवारी दिल्यावरून टीका केली. पंतप्रधान हे अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्तेवर आले. मात्र पाच वर्षांत अच्छे दिन तर आलेच नाहीत. मात्र आता जनता पूर्वीचे बुरे दिन तरी परत करा, असे म्हणण्याच्या मन:स्थितीत आहेत. बेरोजगारांना नोकऱ्या देण्याच्या आश्वासनाचे काय झाले, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. जीएसटीमुळे गरिबांचेही कंबरडे मोडल्याचे त्यांनी सांगितले.

मुस्लीम आणि दलित बांधवांचे प्रश्न मांडण्यासाठी औरंगाबादकरांपुढे आमदार जलील यांच्यासारखा विश्वासार्ह चेहरा दुसरा कोणता नसून विकासासाठी त्यांना लोकसभेत पाठवावे, असे आवाहन केले. शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे, हर्षवर्धन जाधव, काँग्रेसचे सुभाष झांबड या उमेदवारांवरही त्यांनी टीका केली.