‘…. तर गृहमंत्री अनिल देशमुख ईडी चौकशीच्या जाळ्यात येण्याची शक्यता’

0
265

मुंबई, दि.२२ (पीसीबी) : राष्ट्रीय तपास यंत्रणेनंतर (एनआयए) आता महाविकासआघाडी सरकारच्या मागे आणखी एका केंद्रीय यंत्रणेचा म्हणजे सक्तवसुली संचलनालय (ईडी)चा ससेमिरा लागण्याची शक्यता आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी काही दिवसांपूर्वी एक पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. अनिल देशमुख यांनी सचिन वाझे आणि काही पोलीस अधिकाऱ्यांना बार आणि रेस्टॉरंटसकडून 100 कोटी रुपये जमा करण्याचे टार्गेट दिल्याचा दावा परमबीर सिंह या पत्रात केला होता. ईडी ने चौकशी सुरू केली तर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेकांची पळता भुई थोडी होईल, अशी चर्चा आहे.

ही रक्कम खूपच मोठी असल्याने आता ईडी स्वत:हून या प्रकरणाची चौकशी करेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे ठाकरे सरकारच्या अडचणीत आणखीनच भर पडू शकते. सूत्रांच्या माहितीनुसार, सध्या ‘ईडी’कडून परमबीर सिंह यांच्या दाव्यातील तथ्य तपासण्याचे काम सुरु आहे. ईडी यासंदर्भातील सगळ्या घडामोडींवर नजर ठेवून आहे. 100 कोटींचा आकडा हा खूपच मोठा आहे. त्यामुळे ‘ईडी’कडून आता याप्रकरणाची चौकशी होऊ शकते. तसे झाल्यास ईडी पोलीस अधिकारी गृहमंत्री अनिल देशमुख यांना चौकशीच्या जाळ्यात खेचण्याची शक्यता नाकारता येत नाही.

‘मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणाचा उलगडा; एटीएसची आज पत्रकारपरिषद’ –
राज्य दहशतवादविरोधी पथकाचे अधिकारी शिवदीप लांडे यांनी रविवारीच मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणाचा उलगडा झाल्याची माहिती दिली होती. हे प्रकरण राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे जाण्यापूर्वीच एटीएसने याप्रकरणाचा छडा लावला आहे. यानंतर सोमवारी एटीएसकडून पत्रकारपरिषद घेतली जाईल, अशी माहिती समोर येत आहे. यावेळी मनसुख हिरेन हत्याप्रकरणाविषयी माहिती दिली जाऊ शकते.

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली बैठक’ –
या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी विधी व न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला गृहखात्याचे अधिकारीही उपस्थित राहतील. दुपारी चार वाजता ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे या बैठकीत काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.