जनतेने मोदी-शहांचा सत्तेचा दर्प उतरवला – शरद पवार

0
810

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत जनतेने मोदी सरकारचा चार वर्षातील एकहाती कारभार व लोकशाही विरोधी धोरणांना कडाडून विरोध केला आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून जनतेने  मोदी-शहांचा सत्तेचा दर्प उतरवला आहे, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (बुधवार) येथे केली आहे. 

पवार म्हणाले की, गांधी परिवारावर मोदी – शहा यांनी विखारी टीका केली. सतत गांधी परिवारावर अत्यंत खालच्या पातळीवर जावून केलेली टीका म्हणजे सत्तेचा दर्प  आहे, तो दर्प जनतेने खाली उतरवला आहे, असे सांगून २०१९ मध्ये राज्यात आणि देशात निश्चितपणे सत्तांत्तर अटळ असल्याचे पवारांनी सांगितले.

रिझर्व्ह बॅंक, सीबीआय आणि  इतर संवैधानिक संस्थाच मोदींनी सरकारच्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न  सुरू केला आहे. नोटाबंदीचे अपयश झाकण्यासाठी आरबीआयवर  दबाव आणणे, हे जनतेला रूचले नाही. याचे  पडसाद पाच राज्यातील निवडणुकीत उमटले, असे पवार यांनी सांगितले. २०१९ मध्ये देशात व राज्यात निश्चितपणे सत्तांतर होण्याचा दावा करून आगामी निवडणुकीत शिवसेना भाजप युती होईल, असेही पवार म्हणाले.