गुंडगिरी संपवली, बीड जिल्ह्याची मीच गृहमंत्री – पंकजा मुंडे   

0
831

बीड, दि. १२ (पीसीबी) – भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे गृहमंत्री असताना त्यांनी मुंबईतील गुंडगिरी आणि गँगवार संपवून टाकले होते. त्याप्रमाणेच  बीड जिल्ह्यातील गुंडगिरी संपवल्याचे सांगून आपण बीड जिल्ह्यापुरते गृहमंत्री असल्याचे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी आज (गुरूवार) येथे  म्हटले . या विधानातून पंकजा यांनी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना नाव न घेता  टोला लगावला आहे.

दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित महाआरोग्य शिबिराच्या उदघाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.

मी बीड जिल्ह्यातील दहशत, दादागिरी,गुंडगिरी संपवली आहे. यापुढे कोणालाही घाबरण्याची गरज नाही. चांगले काम करा आणि माझ्या पाठीशी राहा असे आवाहन पंकजा यांनी यावेळी केले. दरम्यान, पंकजा मुंडे यांनी आपण जिल्ह्यासाठी का होईना गृहमंत्री असल्याचा पुनरूच्चार करून आपली या पदाबद्दलची सुप्त इच्छा पुन्हा एकदा बोलून दाखवली आहे.

पाच राज्याच्या निवडणुकीच्या निकालानंतर काही जण हुरळून गेले आहेत. मात्र, हा पराभव नसून विजयच आहे.  आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपचीच सत्ता येणार  आहे, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.