नागपूर, दि. २५ (पीसीबी) – कोट्यवधीची कोहिनूर मिलची जागा खरेदी करण्यासाठी पैसे आले कुठून ? २० वर्षांपूर्वी स्कुटरने फिरत होते, ते आता कोट्यधीश कसे झाले? असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांना केला आहे.
नागपूरमध्ये पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी ते म्हणाले की, सक्तवसुली संचालनालय (ईडी) एका दिवसात कारवाई करीत नाही. त्यासाठी अनेक वर्षे रेकी केली जाते. उत्पन्नाचे स्रोत तपासले जातात. त्यामुळे सरकारच्या आदेशावरून ईडी कारवाई करत आहे, असा आरोप करणे म्हणजे हास्यास्पद आहे.
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, अजित पवार यांचे विषय आता न्यायालयात आहेत. या प्रकरणामध्ये न्यायालयाने जी माहिती मागविली आहे . तेवढी माहीत सरकार देत आहे. आमचा विषय तेथेच संपला आहे. त्यामुळे सरकार राजकीय आकसापोटी कारवाई करत असल्याचा आरोप चुकीचा आहे, असेही पाटील म्हणाले.
महाजनादेश यात्रा ही आभार यात्रा आहे. यामध्ये सरकारने पाच वर्षांत जे काम केले, ते जनतेसमोर मांडणे. त्यांच्याकडून फीडबॅक घेतला जातो, नवीन सुचना घेणे ही प्रक्रिया सुरु आहे. ज्या जनतेने आम्हाला निवडून दिले, त्यांच्याप्रती आम्ही उत्तरदायी आहोत, असे पाटील यांनी सांगितले.