सातारा, दि. १२ (पीसीबी) – राज्यातील सध्याचे वातावरण पाहता पुन्हा एकदा राज्यात शिवसेना, भाजपा आणि महायुतीचेच सरकार येणार हे निश्चित आहे. काँग्रेस आणि ‘भ्रष्ट’वादी काँग्रेसला लोकांनी नाकारले आहे, असे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडले.
शंभूराजे देसाई यांच्या प्रचारासाठी साताऱ्यातील पाटणमध्ये झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. ते म्हणाले की, मी प्रचारासाठी येथे आलो आहे, मात्र मला जे वातावरण दिसते आहे त्यामुळे प्रचाराची गरजच नाही, असे वाटत आहे. पुन्हा एकदा सत्तेवर महायुतीचेच सरकार येणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, तळकोकण, सोलापूर, सांगली, सातारा या ठिकाणी पूरस्थिती असताना शिवसेनेने मदतीसाठी कॅम्प लावले होते. सेवाभाववृत्ती त्यावेळी शिवसेनेने दाखवली. लोकांना मदत करण्याची वृत्ती दाखवली. हाच शिवसेनेचा विचार आहे तो आपण पुढे घेऊन जातो आहोत.