मुंबई, दि. १२ (पीसीबी) – शिवसेनेला भाजपपेक्षा जास्त जागा मिळाल्या, तर आदित्य ठाकरेंऐवजी तुम्हीच मुख्यमंत्री व्हा, असे मी उद्धव ठाकरे यांना नक्की सांगेन, असे रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
आठवले म्हणाले की, वरळी हा आमचा बालेकिल्ला आहे. सर्व आंबेडकरी मते आदित्य यांना मिळतील. तसेच मराठी मतेही मिळतील. आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न शिवसेनेला रंगावायला हरकत नाही. मात्र सध्याचे चित्र पाहता माझ्या मताप्रमाणे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, असेही ते म्हणाले.
राजकारणामध्ये कधी काहीही होऊ शकते. शिवसेनेच्या जास्त जागा आल्या तर आदित्य ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदासाठी नंबर लागू शकतो. पण अशावेळी आदित्य ठाकरेंचा नंबर लागण्यापेक्षा उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री होणे आवश्यक आहे. आदित्यऐवजी तुम्हीच मुख्यमंत्री व्हा असं मी त्यांना सांगेन. आदित्यला मुख्यमंत्री करण्याची शिवसेनेच तयारी आहे. त्यांच्याबद्दल आम्हाला, जनतेला सर्वांना आदर आहे पण एकदम ते मुख्यमंत्री पद संभाळू शकतील, असे वाटत नाही, असे आठवले म्हणाले.